pune news : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संशोधन कार्य, आर्थिक विचार मह्त्त्वपुर्ण व प्रेरणादायी असून विद्यार्थी वर्गाने ज्ञान आत्मसात करुन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता निर्मांण झालेली आहे, असे मत डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पांडकर यांनी व्यक्त केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येरवडा येथील डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात बुद्धिस्ट सेंटरच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या “भारतीय रुपयाचा प्रश्न ” या ग्रंथाचे शताब्दी वर्ष आहे.
यानिमित्ताने “अर्थतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर “या विषयावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पांडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शीला गायकवाड होत्या. यावेळी बुद्धिस्ट सेंटरचे समन्वयक प्रा.डॉ.गौतम बनसोडे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय वित्तव्यवहाराची केंद्रे व राज्य शासनाचे संबंध कसे असतात, भारतातील रुपयाचा इतिहास, ब्रिटिश येण्याआधीची व नंतरची चलन पध्दती कशी होती याबाबत डॉ. आंबेडकर यांनी संशोधन कार्य केले. शासनाने देशाचा विकास करत असताना नागरिकांसाठी मोठया प्रमाणात खर्च करण्याची गरज आहे.
शासनाचा स्वायत्त संस्थावरील प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून यात बदल झाला पाहिजे, असे मत डॉ. मनोज पांडकर यांनी व्यक्त केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.गौतम बनसोडे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.राजेंद्र घोडके यांनी केले.