पुणे- महापालिकेकडून मागील वर्षी अभय योजनेचा फायदा घेऊन दंडमाफी मिळवलेल्या दीड लाख थकबाकीदार मालमत्ताधारकांपैकी 72,700 मालमत्ताधारक यंदा पुन्हा थकबाकीदार असून, त्यांनी यावर्षी 174 कोटी रुपये थकवले. त्यांना गेल्या वर्षी दिलेली दंडमाफी रद्द करण्यात यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
वेलणकर म्हणाले, “मागील वर्षी महापालिकेने अभय योजना आणली होती, ज्यात थकबाकीदारांचा 75% दंड माफ करण्यात आला. या योजनेचा लाभ घेऊन गेल्या वर्षी 1,49,700 थकबाकीदारांनी मालमत्ता कराची थकबाकी भरली. त्यात, 72,700 मालमत्ताधारकांनी यंदा परत 174 कोटी रुपये थकवले आहेत. त्यामुळे अभय योजना म्हणजे नियमित कर भरणाऱ्या प्रामाणिक नागरिकांना शिक्षाच आहे. या अभय योजनेचा फायदा घेणाऱ्या मालमत्ता धारकांनी यंदा परत कर थकवणे म्हणजे त्यांची कर भरण्याची मानसिकता नसल्याचे दाखवून देते. त्यामुळे, मागील वर्षी अभय योजनेचा फायदा घेऊन दंडमाफी मिळवलेल्या थकबाकीदार मालमत्ताधारकांपैकी यंदा पुन्हा थकबाकीदार झालेल्या मालमत्ताधारकांना गेल्या वर्षी दिलेली दंडमाफी रद्द करण्यात यावी, त्याचा बोजा परत त्यांच्या मालमत्ता करात चढविण्यात यावा.’