बारामती/ जळोची -ज्यांनी 800 शेतकऱ्यांचा बळी घेऊन कृषी कायदे मागे घेतले. ज्यांच्यामुळे रासायनिक खतांच्या किमती वाढल्या. त्यांच्यासोबत कसं जाणार? असा सवाल करीत आगामी काळात भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नांवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. स्वाभिमानीच्या हुंकार यात्रेनिमित्त त्यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. एप्रिलअखेर आला तरी अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाविना शेतात शिल्लक आहे. एफआरपीचे तुकडे करून शासनाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचा बळी जातो आहे. शिरोळसह अन्य ठिकाणी त्यातून दुर्घटना घडल्या आहेत. केंद्राच्या धोरणांमुळे रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. इंधन दर वाढीमुळे मशागतीचा खर्च वाढला आहे. उसाचा टनामागे 214 रुपयांची खर्च वाढला आहे. त्यामुळे सध्या मिळणारा ऊस दर परवडत नाही.
शेट्टी पुढे म्हणाले, शरद पवार हे 10 वर्षे कृषीमंत्री होते. त्यांनी हा निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असती; मात्र ते जाणीवपूर्वक ऊस हे आळशी माणसाचं पीक असल्याचे बोलत आहेत. या ऊस उत्पादकांमुळेच त्यांच्या पुतण्या आणि नातवांचे कारखाने झाले. कोळसा टंचाई हे कारणच तकलादू आहे. पण केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे भूमिका मांडली पाहिजे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या तडजोडी चालतात, ते नवीन नाही.
विरोधक ईडी, इन्कम टॅक्स, भोंग्यापुढे जाईनात
करोना काळात शिक्षणाचा बट्याबोळ झाला. रोजगाराचे अनेक प्रश्न निर्माण झाले. अनेकांना शिक्षण सोडावे लागले. आरोग्य, म्हाडा पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्याकडे लक्ष देणे गरजेचे असताना विरोधक ईडी, इन्कम टॅक्स, भोंग्याच्या पुढे जायला तयार नाहीत. सत्ताधारी मश्गुल आहेत. केंद्रातल्या अपयशावर विरोधक गप्प आहेत. तर राज्यातल्या प्रश्नांवर इथले विरोधक गप्प आहेत. अळीमिळी गुपचिळी अशी अवस्था आहे. त्यासाठी हुंकार आंदोलन हाती घेतले आहे. त्याचा परिणाम विद्रोहात होईल.
…म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर
11 फेब्रुवारीला शरद पवार यांना पत्र लिहिले होते. त्यात सरकारच्या धोरणाबद्दल आक्षेप नोंदवला होता. सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही पत्र लिहिले. शेतकऱ्यांसंबंधी अन्यायकारक निर्णयावर त्यांच्याकडून कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे कार्यकारिणीशी बोलून मी महाविकास आघाडीतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.