पुणे –हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या कामासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी गणेशखिंड रस्त्याचे विकास आराखड्यानुसार रूंदीकरण तातडीने करावे, अशी मागणी पीएमआरडीएने महापालिकेकडे पत्राद्वारे केली आहे.
या रस्त्याची आराखड्यातील रुंदी 45 मीटर असून प्रत्यक्षात जागेवर हा रस्ता 36 मीटरचाच आहे. त्यामुळे उड्डाणपुलासाठी रस्त्याच्या मधोमध बॅरिकेडिंग केल्यास या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होईल. त्यामुळे तातडीने शक्य तेवढी जागा ताब्यात घेऊन हे रुंदीकरण पूर्ण करावे, अशी मागणी पीएमआरडीएकडून करण्यात आली आहे. त्यामुळे हे भूसंपादन होईपर्यंत या रस्त्याचे काम सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे पाडकाम मागील वर्षी जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये पूर्ण झालेले असले तरी अद्याप या ठिकाणच्या नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आलेले नाही. हे काम सुरू करताना विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौकापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी 11 मीटर रुंदीचे बॅरिकेडस लावण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूस जेमतेम दोन ते अडीच लेन जागा वाहनांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. या शिवाय, सेनापती बापट चौक ते शिवाजीनगरपर्यंत रस्त्याच्या मध्ये 9 मीटर बॅरिकेडस लावण्यात येणार आहे.
परिणामी, सायकल मार्ग, पादचारी मार्ग जाता या ठिकाणी केवळ 2 लेनचा रस्ता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी या रस्त्यावर वर्दळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात कोंडी होणार आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण झाल्याशिवाय मेट्रोचे काम सुरू करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात या कामाबाबत नुकत्याच विभागीय आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत महापालिकेच्या विकास आराखड्यातील रूंदीकरणा प्रमाणे पहिल्या टप्प्यात विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौक या 250 मीटर लांबीच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या शासकीय संस्थाची जागा महापालिकेने तातडीने ताब्यात घ्यावी तसेच या भागातील सेवा वाहिन्या स्थलांतर करून प्राधिकरणाच्या माध्यमातून रुंदीकरणाचे काम करावे, असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तर रुंदीकरण झाल्याशिवाय काम करू नये, अशी स्थानिक लोकप्रतिनिधींचीही मागणी आहे. त्यामुळे महापालिकेने आधी रस्ता रुंदीकरण करून द्यावा त्यानंतरच काम सुरू करणे शक्य असल्याचे पीएमआरडीएने महापालिकेस कळविले आहे.