प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 – नाल्यावरील अतिक्रमणांमुळे पूरस्थिती उद्भवली. त्यावर महापालिकेने लाखो रुपये खर्चून विठ्ठलवाडी स्मशानभूमी येथे मुठा नदीला नाला मिळतो, तिथे कल्वर्ट रुंदीकरण हाती घेतले आहे. त्यासाठी ही कल्वर्ट जवळपास 15 ते 20 फूट रुंद केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, अतिक्रमणांमुळे येथे नाला अवघा तीन फुटांचाच शिल्लक आहे. पण, हे अतिक्रमण धडधडीत दिसत असतानाही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने सप्टेंबर 2019 मध्ये पुण्यात पूरस्थिती उद्भवली. त्या दिवशी तळजाई टेकडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. त्यामुळे हे पाणी आंबिल ओढा तसेच सिंहगड रस्त्याकडेच्या नाल्यांनाही पूर आला होता. तुकाईनगरमधूनही एक नाला विठ्ठलवाडीत येत असून त्यावर अतिक्रमणे झाल्याने 2019 मध्ये येथील दुकानांत पाणी शिरले होते. त्यावर हा नाला नदीला मिळतो, तिथं रूंद करून मोठे कल्वर्ट बांधण्याचे काम पालिकने हाती घेतले आहे. हा नाला बंद चॅनेलमधून येत असून त्याची रुंदी केवळ तीन फूटच असल्याचे समोर आले आहे. तर, हा नाला बंदिस्त होण्यापूर्वी विश्रांतीनगर, तुकाईनगर येथे त्याची रुंदी 20 फुटांपेक्षा अधिक आहे. त्यानंतर पुढे हा नाला सिंहगड रस्त्याकडे येताना भराव टाकून अतिक्रमित करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी औद्योगिक वसाहतीखालून नदीपात्राच्या शेवटी येताना तो अवघा 3 फूटच शिल्लक आहे. त्यामुळे कल्वर्टचे काम करताना अतिक्रमणांबाबत विचार करणे अपेक्षित आहे. पण, केवळ तात्पुरती मलमपट्टी करत नाल्याच्या शेवटी कल्वर्ट वाढविण्यात येत आहे. त्यामुळे तळजाई परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास पूरस्थितीची भीती आहे.