पुणे – महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस, म्हाळूुगे आणि बालेवाडीला लवकरच महापालिकेचे पाणी सर्वात आधी मिळणार आहे. या 34 गावांसाठी टप्प्याटप्प्याने आराखडे तयार करून त्यांना जलवाहिनीद्वारे समान पाणी योजनेअंतर्गत पाणी देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात या तीन गावांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास मान्यता देऊन लगेचच या योजनेचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, उर्वरित गावांचे आराखडे करण्याचे काम सुरू असून हे सर्व आराखडे 30 जूनपर्यंत पूर्ण करून त्यांनाही टप्प्याटप्प्याने मान्यता दिली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे महापालिकेकडून पुढील काही महिन्यांतच या गावांना पाणी देण्यास सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.
महापालिका हद्दीत 4 वर्षांपूर्वी 11 गावांचा समावेश झाला. त्यानंतर आता नवीन 23 गावे समाविष्ट झाली आहेत. या गावांच्या पाणी योजनांची जबाबदारी ग्रामपंचायत तसेच पीएमआरडीएकडे होती. मात्र, ही गावे पालिकेत आल्यानंतर महापालिकेस या गावांना पाणी देणे शक्य नसल्याने वाद सुरू आहेत. तर हा वाद उच्च न्यायालयात गेला असून महापालिकेने या गावांना टॅंकरने पाणी द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, महापालिकेने या गावांमधील सोसायट्यांना टॅंकरने पाणी देण्यास अमर्थता दर्शविली आहे. मात्र, त्यासोबतच पालिकेकडून शहरात सुरू असलेल्या समान पाणी योजनेत या गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, महापालिकेने गावांची लोकसंख्या तसेच सध्याच्या पाण्याची स्थिती लक्षात घेऊन त्याबाबत आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला होता. एकाचवेळी या गावांचा आराखडा करायचा झाल्यास त्यास वेळ जाणार असल्याने पालिका टप्प्याटप्प्याने हे काम करणार आहे. त्यात, पहिला आराखडा सुस, म्हाळूंगे आणि बालेवाडीचा करण्यात आला आहे. त्यामुळे जलवाहिनीद्वारे महापालिकेच्या जलवाहिन्यांमधून या गावांना पाणी पुरवठा केला जाणार असून या गावांमध्ये स्वतंत्र पाण्याच्या टाक्या उभारल्या जाणार आहेत.
गायरान जागांवर पाण्याच्या टाक्या!
या गावांचा विकास आराखडा करण्याचे काम “पीएमआरडीए’कडे सुरू आहे. त्यानुसार, महापालिकेने पाणी पुरवठ्यासाठी आरक्षणे ठेवण्याची हरकत घेतलेली आहे. मात्र, त्यास मान्यता मिळण्यास उशीर लागण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने “पीएमआरडीए’कडे या गावांमध्ये असलेल्या ऍमेनिटी स्पेस तसेच जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या गायराण जागांवर पाण्याच्या टाक्या उभारण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार, तातडीने या दोन्ही विभागांशी पत्रव्यवहार करून टाक्यांसाठी जागा निश्चित केली जाणार आहे.