पुणे – भारती विद्यापीठ परिसरातील त्रिमूर्ती चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी दोन शिफ्टमध्ये आठ वॉर्डनची नियुक्ती केली आहे. बॉटलनेक भागातील अडथळे हटवण्यासाठी महापालिकेच्या मदतीने उपाययोजना सुरू केल्या आहे. यात चिंतामणी हायस्कुल ते सिंहगड महाविद्यालय सेवा रस्त्याचे कामही तातडीने पूर्ण करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडीपासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
भारती विद्यापीठ परिसरात लोकवस्ती वाढली आहे. मात्र, विकास होताना रस्त्यांचे नियोजन केले गेले नाही. यामुळे दिवसरात्र वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक पोलिसांना कात्रज चौक आणि महामार्गावर लक्ष द्यावे लागत असल्याने अंतर्गत भागातील कोंडी सोडवण्यासाठी नागरिकांनाच धाव घ्यावी लागत आहे.
महापालिका सहायक आयुक्त, वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांनी एकत्र येत वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पाहणी अहवाल तयार केला होता. त्यामध्ये अतिक्रमण काढणे, रस्त्याची रुंदी वाढवणे, पदपथांची डागडुजी करणे आणि नियोजनासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे अशा सूचना होत्या. हे पत्र मनपा मुख्य कार्यालयात मागील काही महिने पडून आहे. वाहतूक पोलिसांनी तब्बल तीन वेळा त्याचा मागोवा घेतला.
इच्छापूर्ती गणेश मंदिरापासून त्रिमूर्ती चौकापर्यंत रांगा लागलेल्या असतात. तर आंबेगाव पठाराकडून त्रिमूर्ती चौकात येणाऱ्या वाहनांना रस्ता खूपच अरुंद आहे. यातच संध्याकाळी तेथे भाजीविक्रेत्यांच्या रांगा असतात. चौकात कोंडी होताच, नागरिक दिसेल तेथून वाहने पुढे नेतात. यामुळे गल्लीबोळांतही कोंडीत होत असते.
“भारती विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेशी समन्वय साधला जात आहे. चिंतामणी हायस्कुलजवळ सेवा रस्त्यावर गॅस वाहिनीजे काम सुरू असल्याने तेथील वाहने त्रिमूर्ती चौकात येत आहेत. त्यामुळे कोंडीत वाढ झाली आहे. हे काम तातडीने पूर्ण झाल्यास चौकातील भार कमी होईल.” – प्रशांत कणसे, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक