पुणे – मुंबई ते सोलापूर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसची (22105) वेळ बदलण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बदलणाऱ्या वेळेमुळे प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.
मुंबई स्थानकाहून पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी सुटणारी इंद्रायणी एक्सप्रेस पुणे स्थानकावर सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी तर सोलापूर येथे दुपारी 1.30 वाजता पोहोचते. ही गाडी नव्या वेळापत्रकानुसार मुंबई स्थानकाहून पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी सुटून पुण्यात सकाळी 8.20 तर सोलापूर येथे दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे.
दरम्यान, इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये येणाऱ्या टीसींकडून (तिकीट तपासणीस) गाडीची वेळ बदलण्यात येणार असल्याचे प्रवाशांना सांगितले जात असून याबाबत “सूचना द्या आणि स्वाक्षरी करा,’ असे आवाहन गेल्या 15-20 दिवसांपासून करण्यात येत आहे. वेळ बदलण्याची गरज नसून टीसीकडून देण्यात येणाऱ्या सूचना वहीमध्ये वेळ बदलण्याला प्रवाशांचा पूर्णपणे विरोध असल्याचे स्पष्टपणे लिहित असल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली. मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना पहाटे 5 वाजून 5 मिनिटांची गाडी गाठण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागणार असल्याचे प्रवाशांनी नमूद केले.