पुणे – लॉकडाउनच्या या काळात सरकारने अत्यावश्यक सेवा चालू ठेऊन नागरिकांना कमीत कमी त्रास होईल अशी दक्षता घेतली आहे. त्यात व्यापारी देखील सरकारचा आदेश पाळून नागरिकांना सर्व अत्यावश्यक सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती देखील प्रयत्न करीत आहे.
पुण्यातील करोना संसर्ग रुग्णांची संख्या वाढत असून सध्या चालू असलेल्या करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीने 26 एप्रिल पासून बाजारात दुचाकी वाहनांना प्रवेश नाकारला आहे. परंतु हा निर्णय पाळणे छोटया व्यापाऱ्यांच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहे. समितीने फक्त टेम्पो आणि ट्रक या माल वाहतूक करणाऱ्या गाडयांनाच प्रवेश दिला आहे.
परंतु या आवारातयेणाऱ्या जास्तीत जास्त छोट्या व्यापाऱ्यांकडे टू व्हीलर गाड्याच असतात. स्थानिक किराणा दुकानदार खरेदी दुचाकीवर च जास्त प्रमाणात करतात. सर्वांकडे टेम्पो किंवा कार असतेच असे नाही. त्यामुळे हा निर्णय व्यापाऱ्यांना खूपच त्रासदायक ठरत आहे. इतर सर्व वाहतूक बंद आहे. अश्या कठीण परस्थितीत समितीने व्यापाऱ्यांच्या दृष्टीने जाचक ठरतील असे निर्णय घेऊ नयेत. असे मत व्यापाऱ्यांनीमांडले आहे.
याला अनुसरून यावेळी पुणे जिल्हा व्यापारी महामंडळचे अध्यक्ष महेश खोपडे, उपाध्यक्ष आनंद बाफना, सचिव कैलास जोशी, राजू डांगी आणि दीपक घुबे यांनी बाजार समितीने हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांना निवेदन दिले आहे.
अश्या परिस्थितीत बाजार समिती कडून सहकार्याची अपेक्षा आहे. हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा किरकोळ व्यापारी दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्या शिवाय काहीच पर्याय नसेल अशी माहिती सचिव कैलास जोशी यांनी दिली आहे.
किरकोळ व्यापाऱ्यांना दुचाकी घेऊन भुसार बाजारात प्रवेश देण्या बाबत योग्य सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून नियमात राहून, काही पर्याय करता येतील का या बाबत विचार करून उद्या निर्णय घेतला जाईल, असं कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी.जे.देशमुख यांनी सांगितलं आहे.