जांभूळवाडी : पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळे तलाव परिसर विद्रुप झाला आहे.
आंबेगाव बुद्रुक – जांभुळवाडी तलाव परिसरात अतिक्रमण होत असल्याने तलावाचे बुडीत क्षेत्र कमी होत आहे. या तलावाचा विकास करणे गरजेचे असून पाटबंधारे विभागाने तलावाची मोजणी करून नकाशानुसार तलाव परिसर जाहीर करणे गरजेचे आहे. परंतु, या महत्वाच्या कामी पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. यामुळे तलावालगत अतिक्रमण वाढू लागले आहे. याकामी महापालिका प्रशासनाकडूनही कोणतीही कार्यवाही केली गेलेली नाही.
जांभुळवाडी तलाव प्रकल्प गेली अनेक वर्षे रेंगाळलेला आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर याकामी मर्यादा आलेल्या असताना प्रशासकांनी या तलावाचे शुद्धीकरण, सुशोभिकरण याकडे लक्ष देणे गरजेचे असताना प्रशासकांनी गेल्या दोन वर्षांत साधी पाहणीही केलेली नाही. या तलावाचे वाढते प्रदूषण तसेच झालेली दुरवस्था पाहता प्रशासकांनी यावर तातडीने उपाययोजना राबवावी, अशी मागणी नागरिकांसह आजी-माजी पदाधिकार्यांनी केली आहे.
महापालिका व पाटबंधारे विभाग यांचे दुर्लक्ष असल्याने जांभुळवाडी तलाव दुर्लक्षीत राहिला आहे. सध्या, तलावालगतच्या गृह सोसायट्यांचे सांडपाणी तलावात सोडले जात असल्याने जल प्रदूषणाचा प्रश्न कायम आहे. यातून तलावाचे अस्तित्वच धोक्यात आलेले असतानाही महापालिका प्रशासन ढिम्म आहे. पुणे महापालिका प्रशासक तसेच पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी या तलावाची एकत्र पाहणी करून सदर तलावाचा विकास करणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
“जांभुळवाडी तलावाकडे गेल्या काही वर्षांपासून पालिका तसेच पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. तलावाचा विकास होणे गरजेचे असताना अधिकारी, अभियंते इकडे फिरकतही नाहीत. अतिक्रमण वाढू लागली आहेत. पाटबंधारेने तलावाची मोजणी करून नकाशानुसार परिसर जाहीर करणे गरजेचे आहे.” – युवराज बेलदरे, माजी नगरसेवक, आंबेगाव बु.