वर्षानुवर्षे होत असलेल्या त्रासावर जालीम उपाय शोधण्यात प्रशासन अपयशी
पुणे – शहरात शुक्रवारी झालेल्या पावसाने जयंतराव टिळक पुलाखालील बाजूस असलेल्या भुयारी मार्गात अक्षरश: गुडघाभर पाणी साचले आहे. पाऊस होऊन दुसरा दिवस लोटला, तरी अद्याप पालिकेच्या यंत्रणेने हे पाणी काढण्यासाठी काहीच उपाय योजना केलेली नाही. त्यामुळे नागरिकांना नालाईजास्तव या अस्वच्छ पाण्यातून रस्ता काढत शनिवारवाड्याकडे जावे लागत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
डेक्कन तसेच टिळक चौकातून नदीपात्रातील रस्त्याने आलेली वाहने शनिवारवाडा तसेच शिवाजीरस्ता आणि पुढे पुणे स्टेशनकडे जाण्यासाठी पुलाखालील मार्गाचा वापर करतात. तर, काही लोक हा मार्ग वापरत नसल्याने आणि काही वाहने सरळ पुलावरून जात होती. त्यावर वाहतूक पोलिसांनी शनिवारवाडयाकडे जाणाऱ्या वाहनांना हा पूल वापरणे बंधनकारक केले आहे. अनेकदा पोलीस या ठिकाणी कारवाईसाठी उभे असतात.
त्यामुळे जवळपास सर्वच वाहनचालक या भुयारी मार्गाचा वापर करतात. शुक्रवारच्या पावसाने या भुयारी मार्गात दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबले होते. त्याचा निचरा होण्यासाठी पालिकेने काहीच यंत्रणा उपलब्ध केली नाही. त्यामुळे शनिवारीही या मार्गात जवळपास तीन फुटांपेक्षा अधिक पाणी होते. त्यामुळे अनेक वाहन चालक नो एन्ट्रीतून शनिवारवाड्याकडे गेल्यास कारवाई होईल, या भीतीपोटी या पाण्यातून वाट काढत होते.
जयंतराव टिळक पुलाखालील पाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने काम केले जाईल. प्रत्यक्षात ड्रेनेज विभागास याबाबत यापूर्वीच सूचना दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काम झाले की नाही हे सांगता येणार नाही. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीनं हे पाणी काढून मार्ग मोकळा केला जाईल.
– आशिष महादडळकर, सहायक आयुक्त, महापालिका