पुणे – राज्यसभा निवडणुकीचा निकाल हा धक्का बसेल, असा नाही. प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्या कोट्यामध्ये काही फरक पडलेला नाही. एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आहे आणि ते कुठून आले ते मला ठाऊक आहे. ते मत महाविकास आघाडीचे नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
“शिवसेनेने लढवलेल्या सहाव्या जागेसाठी मतांची संख्या कमी होती. तिथे आमचा फरक वाढत होता. पण धाडस करत प्रयत्न केला. अपक्षांची संख्या भाजपाकडे अधिक होती, पण दोघांनाही पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजपला आम्हाला पाठिंबा देणारे जे इच्छुक होते त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपने जी कारवाई केली त्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे. भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले. हे मान्य केले पाहिजे,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस यांच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. अपक्ष आमदारांमध्ये या गमती झालेल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसला आलेले ज्यादाचे मत हे शिवसेनेला जाणार नव्हते. ते आमच्या विरोधकांच्या कोट्यातील एक मत होते ते राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळाले. माझ्यासोबत काम केलेले अनेक लोक भाजपमध्ये आहेत. त्यांना मी शब्द टाकला असता तर त्यांनी नाही म्हटले नसते. पण मी त्याच्यात पडलो नाही, असे पवार यांनी सांगितले.
भाजपने घेतलेली हरकत म्हणजे रडीचा डाव
भाजपने निवडणूक आयोगाला पत्र लिहून महाविकास आघाडीच्या तीन मतदारांची मते बाद करण्याची मागणी केली होती. भाजपने घेतलेली ही हरकत रडीचा डाव होता. राज्यसभेच्या निर्मितीच्या नियमानुसार मतदाराने पक्षाच्या नेतृत्वाला मत दाखवायचे असते. त्यामुळे जर कोणी नाना पटोले आणि जयंत पाटील यांना मत दाखवले तर यामध्ये बेकायदेशीर काही नाही. याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला असला, तरी त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागण्यास उशीर झाल्याचे पवार यांनी सांगितले.