सरदार यशवंत पोतनीस आणि कुटुुंबीयांचे योगदानाच्या नोंदी सापडल्या
पुणे – रायगड किल्ल्याचे रक्षण आणि कारभार जवळपास 41 वर्षे म्हणजेच इ.स. 1733 पासून 1772 पर्यंत सरदार यशवंत महादेव पोतनीस व त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विठ्ठल पोतनीस हे पाहत होते, असे प्राप्त कागदपत्रांवरून दिसून येत आहे. त्यासाठी पोतनीस यांना 1 लाख 75 हजार 306 रुपयांचा सरंजाम छत्रपती शाहू महाराजांनी लावून दिला होता. यशवंतराव पोतनीस यांचा शिक्कादेखील उपलब्ध झाला आहे. आजपर्यंत रायगडासंबंधित जी कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत, त्यामध्ये पोतनीस घराण्याचे कागद उपलब्ध नव्हते. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या नव्या संशोधनामुळे रायगडावरच्या सर्व 529 लोकांची नावे व त्यांचे पगारपत्रक पहिल्यांदाच उपलब्ध झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बलकवडे यांना भारत इतिहास संशोधन मंडळाच्या दप्तरखान्यात रायगडाशी संबंधित अंदाजे 2 हजार मोडी कागदपत्रे सापडली. त्यामध्ये 44 वर्षांनंतर 6 जून 1833 रोजी रायगड किल्ला मुक्त करणारे छत्रपती शाहू महाराजांचे खासगी कारभारी आणि खजिन्याचे कारभारी यशवंतराव पोतनीस यांचा संग्रह आहे. यामध्ये इ.स. 1766 साली रायगडाच्या रक्षणासाठी छत्रपतींनी नेमलेल्या 529 लोकांची नावे, त्यांची वय, ते चालवीत असलेली शस्त्रे आणि त्यांचा पगार या विषयाची माहिती आपणास मिळते.
त्याचबरोबर रायगडचा किल्लेदार, सरनोबत, तटसरनोबत, सरनाईक, तटसरनाईक, कारखानीस, सबनीस, मुजुमदार, फडणीस, दप्तरदार, कोठावळा, गोलंदाज, जंजालदार इत्यादींची नावे समजतात, असेही बलकवडे यांनी म्हटले आहे. रायगडावर महाडिक, मालुसरे, पलांडे, मामुनकर, शेळके, पोतनीस इत्यादी आडनावाची जवळ जवळ 37 सरदार आपल्या पतकासह रायगडाच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडत होते, असे आपणाला दिसून येते.
असा आहे इतिहास
छत्रपती शिवरायांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी याच रायगडावरून 9 वर्षे स्वराज्याचा कारभार पाहिला. त्यानंतर संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी 7 महिने रायगड किल्ला लढविला. शेवटी 3 नोव्हेंबर 1689 रोजी फितुरीने रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली 18 व्या शतकात मराठा साम्राज्याचा पाया घातला गेला. परंतु 1733 सालापर्यंत रायगड किल्ला शत्रुच्या ताब्यातच होता.
44 वर्षांच्या पारतंत्र्यानंतर 6 जून 1733 रोजी शिवतीर्थ रायगड किल्ला पुन्हा स्वराज्यात आला. त्यामध्ये सरदार यशवंतराव पोतनीस यांनी मोलाची कामगिरी केली होती. म्हणूनच शाहू महाराजांनी रायगडाच्या रक्षणाची व कारभाराची जबाबदारी यशवंतराव पोतनीसांवर सोपविली होती. 1733 पासून 1772 पर्यंत 41 वर्षे पोतनीस घराण्याने रायगडाचे रक्षण केले. 1772 मध्ये छत्रपती रामराजे यांच्या आज्ञेने रायगड किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला. तो 1818 पर्यंत म्हणजेच इंग्रजी सेनापती प्रॉथर याने जिकेंपर्यंत पेशव्यांच्या ताब्यात होता,
असेही बलवकडे यांनी निवेदनात म्हटले आहे.