पुणे – खाद्यतेल, विशेषत: पामतेलाचे भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने पाम तेलावरील आयात शुल्कात अडीच टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र, इंडोनेशिया आणि मलेशिया या पामतेल निर्यातदार देशांनी कच्च्या पाम तेलाच्या भावात टनामागे 50 ते 60 डॉलर्सने वाढ केल्याने भावघटीची शक्यता मावळली आहे.
देशात सर्वाधिक आयात पामतेलाची केली जाते. इंडोनेशिया, मलेशियातून पामतेलाची आयात करण्यात येते. दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना, ब्राझील या देशातून सोयाबीन तेलाची आयात केली जाते. युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची आयात करण्यात येते. आंतराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यानंतर पाम, सूर्यफूल, सोयाबीन तेलाच्या भावात वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र शासनाने पामतेलावरील आयात शुल्कात अडीच टक्क्यांनी कपात केली आहे.
मात्र, आयातशुल्क कमी केले असले तरी पामतेलाची निर्यात करणाऱ्या देशांनी भावातवाढ केल्यामुळे भावात घट होणार नसल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी पामतेलावरील आयात शुल्क 8 टक्के होते. आयातशुल्क तसेच अतिरिक्त 10 टक्के कर (सरचार्ज) असे एकूण मिळून साडेअठरा टक्के शुल्क तेल व्यापाऱ्यांना मोजावे लागत होते. अर्जेंटिना, ब्राझील या देशात प्रतिकूल हवामानामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 40 टक्के घट झाली आहे. त्यामुळे खाद्यतेल आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी पहिल्यांदाच अमेरिकेतून सोयाबीन तेल आयात केले. युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थती निवळली असली तरी तेथून होणारी सूर्यफूल तेलाची आयात अपेक्षएवढी होत नसल्याची माहिती खाद्यतेल व्यापाऱ्यांनी दिली.
आयात शुल्क कमी करूनही भावघट का नाही?
आयातशुल्कात कपात झाल्यानंतर निर्यातदार देशांकडून तेलांच्या भावात वाढ करण्यात येते, असे निरीक्षण मार्केट यार्डातील खाद्यतेल व्यापारी कन्हैयालाल गुजराथी यांनी नोंदविले. परदेशांतून जहाजाने (स्टीमर) खाद्यतेलांची निर्यात केली जाते. वाहतूक खर्च वाढलेला आहे. देशांतर्गत कर, वाहतूक खर्च आदी बाबी विचारात घेतल्यास किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या भावात घट होत नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
निर्यातदार देशांकडून प्रतिटन 50 ते 60 डॉलर्सची भाववाढ
खाद्यतेलांच्या आयातीवर अवलंबून
खाद्यातेलांच्या आयातीवर भारत अवलंबून आहे. पेट्रोलनंतर सर्वाधिक आयात खाद्यतेलांची केली जाते. जागतिक बाजारपेठेत चीननंतर भारत खाद्यातेलांचा दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. भारतात दरवर्षाला साधारणपणे 120 ते 130 लाख टन खाद्यतेल आयात केले जाते. आपल्या देशाची गरज साधारणपणे 210 लाख टन आहे. भारतात 80 ते 85 लाख टन तेलनिर्मिती होती.