पुणे –विविध राज्यांतील मनरेगा, नागरी सेवा केंद्रे, ग्रामीण गृहनिर्माण योजना, घनकचरा व्यवस्थापन, ग्रामीण रस्ते, ग्रामपंचायतींच्या विकास योजना, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या अंमलबजावणीचा अभ्यास करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेतील अधिकारी विविध राज्यांना भेटी देणार आहे. त्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली असून, त्यातील एक पथक हिमाचल प्रदेश-हरियाणा या राज्यांना भेटीसाठी रवाना झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले विभागप्रमुख, गटविकास अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पथक हिमाचल प्रदेश आणि हरियाणा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, गुजरात आणि राजस्थान तसेच केरळ या राज्यांना भेट देणार आहेत. पथकाचे नेतृत्व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी करतील. 20 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 दरम्यान हे दौरे असतील. त्यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद मुख्यालयात असतील. या क्षेत्र प्रदर्शन भेटी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रशिक्षण धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रशिक्षण दौऱ्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने आणि महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे.
या आंतरराज्यीय दौऱ्यांमुळे पुणे जिल्हा परिषदेला विविध कार्यक्रम, योजना आणि सेवांच्या अंमलबजावणीच्या धोरणांचे पुनर्मूल्यांकन करण्यात मदत होईल. हरयाणा राज्यातील स्वामीतत्त्व योजना, तेलंगणातील “मिशन भागीरथी’, जलजीवन मिशन, हरितम केरळ, माझी वसुंधरा, आंध्र प्रदेशचा नाडू-नेडू कार्यक्रम, सिक्कीमच्या धारा विकास कार्यक्रम, पश्चिम भागातील लघु पाटबंधारे कामे याचा अभ्यास करणार. तसेच आंध्र प्रदेशच्या डिजिटल पंचायत सेवा आणि कोअर डॅशबोर्डसह हरियाणाच्या फॅमिली कार्ड प्रणालीचा अभ्यास पुणे जिल्ह्यासाठी उपयोगी ठरेल.
कार्यशाळेमध्ये अभ्यास दौऱ्याचे सादरीकरण
या दौऱ्यांमुळे पुणे जिल्ह्यातील प्रशासकीय नेतृत्वामध्ये संघबांधणी होण्यास मदत होईल. दौरा पूर्ण झाल्यावर 6 मार्च 2022 रोजी एक दिवसाची कार्यशाळा होईल. त्यामध्ये अभ्यास दौऱ्याचे सादरीकरण आणि ग्रुप चर्चा करून अहवाल पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सरकार, ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांना सादर होईल. पुणे जिल्ह्यातील प्रशासन सुधारण्यासाठी राज्य सरकारने दिलेला पाठिंबा हे सहकारी संघराज्यवादाचे एक उदाहरण आहे, असे सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.