पुणे – शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यास सुरुवात झाली आहे. पाच लाखांपर्यंतच्या ठेवी असलेल्या ठेवीदारांना रक्कम देण्यासाठी ठेव विमा महामंडळाने सुमारे 281 कोटी रुपये बॅंक ऑफ बडोदामध्ये जमा केले आहेत. त्यानुसार आतापर्यंत निम्म्यापेक्षा अधिक खातेदारांना ठेवीची रक्कम देण्यात आली आहे. मागील दीड महिन्यांत 17 हजारांपैकी सुमारे 10 हजार ठेवीदारांना 160 कोटी रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती बॅंकेचे अवसायक व उपनिबंधक डॉ. राजाराम धोंडकर यांनी दिली. उर्वरित ठेवीदारांना महिनाभरात त्यांच्या खात्यावर ठेवी रक्कम जमा करण्यात येईल, असा विश्वास धोंडकर यांनी व्यक्त केला आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक अवसायनात काढण्याचा प्रस्ताव सहकार विभागाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर बॅंकेकडून ठेवीदारांच्या ठेवींबाबतची माहिती पाठविण्यात येत असून, ती माहिती तपासून ठेव विमा महामंडळाकडून रक्कम मंजूर करण्यात येत आहे.
भोसले बॅंकेकडे अर्ज आल्यानंतर त्याची छाननी करण्यात येते. त्यानंतर खातेदारांना पैसे देण्याचे पत्र बॅंक ऑफ बडोदाला देण्यात येते. त्यानंतर बॅंक ऑफ बडोदाकडून रक्कम थेट खातेदाराच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे. बॅंकेकडून दररोज दोनशे ते चारशे ठेवीदारांना रक्कम देण्यात येत आहे. ज्या ठेवीदारांनी “केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि त्यांचे क्लेम नाकारण्यात आले आहेत. अशा ठेवीदारांची “केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. संबंधित ठेवीदारांना यादीनुसार बॅंकेकडून फोन करण्यात येत आहे. अपूर्ण असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे.
“केवायसी’ प्रक्रिया लवकर पूर्ण करा
ज्या ठेवीदारांनी “केवायसी’ची प्रक्रिया पूर्ण केली नाही, अशा ठेवीदारांनी बॅंकेत येताना ठेवीची मूळ पावती, उपलब्ध असलेले बॅंक खात्याचे चेकबुक व पासबुक बरोबर आणावे, असे आवाहन डॉ. राजाराम धोंडकर यांनी केले आहे. बॅंकेत कागदपत्रे जमा झाल्यानंतर त्यांची पडताळणी व आवश्यक ती प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यानंतरच रक्कम जमा करण्यात येत आहे.