पुणे – यापूर्वी करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या होत्या. आता परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर पुन्हा ऑफलाइन परीक्षा घ्याव्या लागणार असून, हीच भूमिका महाविकास आघाडी सरकारचीही आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली.
“विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबच्या कोणत्याही सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या नसून, परिपत्रक बनावट आहे. राज्यातील विद्यापीठांना परीक्षा घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन, असे दोन्ही पर्याय दिले आहेत. स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून परीक्षांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वी, करोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या होत्या. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळण्यासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या, असे म्हणणे योग्य नाही. राज्य सरकार कायमस्वरुपी ऑनलाइन परीक्षा घेणार आहे, असा गैरसमज कोणी पसरवत असतील, तर ते चुकीचे आहे,’ असे सामंत म्हणाले.
महाविद्यालयांचीभूमिका आडमुठी
“करोनाच्या पार्श्वभूमीवर काही महाविद्यालये शुल्काबाबत अजूनही आडमुठी भूमिका घेत आहेत. या कॉलेजांबाबत विद्यार्थी किंवा पालकांनी तक्रार केल्यास, त्यांच्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल. आमच्यापर्यत जोपर्यत लेखी स्वरूपात तक्रारी येत नाहीत, तोपर्यंत दोष देणे योग्य नाही,’ असेही सामंत यांनी म्हटले.
…म्हणून वसतिगृहे सुरू करण्यास उशीर
वसतिगृहे सुरू करण्याच्या निर्णय उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांत करोनाचा ओमायक्रॉन हा नवा संसर्ग समोर आला आहे. या नव्याने उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे. आता वसतिगृहे सुरू केल्यानंतर, दुर्दैवाने तिसरी लाट आल्यावर पुन्हा क्वारंटाइन सेंटर सुरू करावी लागणार आहेत. त्यामुळे जागा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्या आम्ही शांतपणे एकूण परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.