पुणे – “एकात्मतेचा मंत्र म्हणजे ज्ञानबा-तुकाराम. त्यात सकल संत सामावले आहेत. संतांनी सांगितलेला सेवा धर्म अंगिकारण्याची सध्याच्या काळात गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
संत साहित्याला वाहिलेल्या “ज्ञानबातुकाराम’ या वार्षिक अंकातर्फे वारीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा येथील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्ञानबातुकाराम.कॉम या वेब पोर्टलचे लोकार्पणही करण्यात आले. याप्रसंगी देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे, आळंदी संस्थानचे विश्वस्त अभय टिळक, राजाभाऊ चोपदार, प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे, तुकोबारायांची तपोभूमी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, सोपानदेव पालखी सोहळ्याचे अभय जगताप, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, संजय आवटे, आदी उपस्थित होते.
“पालखी म्हणजे समाजोत्सव आहे,’ असे सांगून विश्वस्त अभय टिळक यांनी वारीत यंदा 15 लाख वारकरी येण्याची शक्यता व्यक्त केली. माणिक महाराज मोरे म्हणाले की, “वारी म्हणजे विचार-आचारांची पालखी होय. त्यानुसार निर्मळ, हरीत, प्लॅस्टिकमुक्त वारी करण्याचा आमचा संकल्प आहे.’ तर “संतांचे विचार सोईनुसार मांडू नये,’ असे मत ऍड. ढगे यांनी व्यक्त केले.
राजाभाऊ चोपदार म्हणाले, “वारीला आम्ही आनंद सोहळा म्हणतो. वारी व्यवस्थापनाचे उत्तम धडे देते. वारी कमीत कमी साधनांत जगायला शिकवते. पत्रकारांनी वारीतील समस्या जरूर मांडाव्यात, त्याचबरोबर उपाय सुचवावेत.’ आवटे म्हणाले, “ज्ञानबातुकामराम’चं बोट सोडलं म्हणून भयंकराच्या दरवाज्यात उभे राहाण्याची वेळ आपल्यावर आली आहे. आपल्यासोबत आत ज्ञानेश्वर होते.
तुकाराम होते. चोखामेळा होते. कान्होपात्रा आणि जनाबाई होत्या, पण नव्या पिढीशी त्यांची गाठभेटच आपण होऊ दिली नाही. पण, आता तरी जागे व्हायला हवे आणि ज्ञानबा-तुकाराम यांच्याकडे पुन्हा जायला हवे.’ उत्कर्ष शिंदे म्हणाले, “पाऊले चालती पंढरीची वाट’सारखी वारीची गाणी गाणारे माझे आजोबा प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. यावेळी त्यांनी करोना काळात ताटातूट झालेल्या देव आणि भक्ताचा विरह व्यक्त करणारे गाणे गायले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीरंग गायकवाड, सूत्रसंचलन उत्तमकुमार इंदोरे यांनी केले.