राजेंद्र वारघडे
पाबळ -शिरूर तालुक्याच्या राजकीय पटलावर युवा पिढीची एंट्री सक्रिय झाली आहे. घोडगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून आमदार अशोक पवार यांचे पुत्र घोडगंगाचे अध्यक्ष ऋषीकेश पवार हे राजकीय प्रवाहात आले. त्यापूर्वी माजी आमदार (स्व) बाबूराव पाचर्णे यांचे पुत्र राहुल पाचर्णे, भाजपाचे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे हे युवा शिलेदारांच्या यादीत आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांतील ज्येष्ठ नेतृत्वाची युवा फळी राजकारणात येत आहेत.
शिरूर विधानसभा मतदारसंघाला आगळे वेगळे महत्व आहे. ते मतदारसंघाचे विशाल सीमेसाठी तर तितकेच महत्व आहे मतदारसंख्येला. त्यामुळे मतदारसंघातून गेल्या 50 वर्षांत अनेक दिग्गज राजकारणात आले आहेत. विधानसभा मतदारसंघामुळे शिरूर हे नाव विधानसभा मतदारसंघाला लाभले.
गेली वीस वर्षे लोकसभा मतदारसंघालाही मिळाले. आता येथील नेतृत्वासाठी तिसरी पिढीने एंट्री घेतली आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघातून शामकांत मोरे, रावसाहेब पवार, बाबुराव दौंडकर, पोपटराव कोकरे, सूर्यकांत पलांडे, बापूसाहेब थिटे, पोपटराव गावडे, बाबूराव पाचर्णे आणि अशोक पवार या नेत्यांनी आमदारकी भूषवली तर उद्योगपती रसिकभाऊ धारीवाल यांना अपयश आले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघातून यातील काही नेत्यांना केवळ शिरूर या नाम वैशिष्ट्यामुळे खासदार होण्याची संधीही मिळाली. काही कालावधीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. वीस वर्षांपूर्वी पूर्वीचा बारामती लोकसभा हा शिरूर लोकसभा मतदारसंघ झाला. त्यानंतर शिरूरचे महत्व अधोरेखित झाले.
यानंतर मात्र, शिरूरच्या दोन्ही राजकीय क्षेत्रात नव्या पिढ्यांचा उदय होत आहे. यामध्ये रावसाहेब पवार यांच्यानंतर विद्यमान आमदार अशोक पवार यांची एंट्री झाली. पोपटराव गावडे यांचे राजेंद्र गावडे व स्नुषा मनीषा गाबडे यांची एंट्री झाली आहे. माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यानंतर राहुल पाचर्णे हे राजकीय प्रवाहात आले. त्याचवेळी रसिकलाल धारिवाल यांचे सुपुत्र प्रकाश धारिवाल हे शिरूर शहरातील राजकारणात प्रस्थापित नेतृत्व आहे. घोडगंगा साखर कारखाण्याचे निवडणुकीत रावसाहेब पवार यांचे नातू विद्यमान आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र ऋषीराज पवार यांची अध्यक्षपदी निवड होऊन सक्रिय राजकारणात एंट्री झाली.
शिरूरचे राजकारण आता युवा पिढीकडे जवळपास हस्तांतरित झाल्याची बाब पुढे येत आहे.दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून संभाजीराव काकडे, शरद पवार, अशोक मोहोळ, शंकरराव बाजीराव पाटील, अजित पवार, बापूसाहेब थिटे, विठ्ठलराव गाडगीळ यांनी खासदारकी भूषविली असली तरी बापूसाहेब थिटे यांना तत्कालीन बारामती लोकसभा मतदारसंघातील याच शिरूरच्या माध्यमातून खासदारकी मिळाली होती.
दरम्यान, बारामती लोकसभा पुनर्रचनेत तालुके बदलले. मात्र, शिरूरची महती कायम राहिली म्हणूनच नवा लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हणून उदयास आला आहे. आता लोकसभा मतदारसंघातही ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू व आमदार अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा असल्याने येत्या लोकसभेसाठी दुसऱ्या पवारांची तिसरी पिढी एंट्री घेते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राष्ट्रवादी, भाजपामध्ये युवा नेतृत्व
राष्ट्रवादीचे ऋषीकेश पवार, भाजपाचे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, राहुल पाचर्णे हे शिरूरच्या राजकीय पटलावर युवा नेते म्हणून परिचित आहेत. त्यात पवार, पाचर्णे यांनाराजकीय पार्श्वभूमी आहे. संजय पाचंगे हे मात्र अपवाद आहेत. त्यांना राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी चळवळीतून वलय निर्माण केले आहे. त्यांचा प्रवास सर्वसामान्य कुटुंबातून झाली आहे. हे तीन शिलेदार शिरूरच्या मैदानात आहेत. त्यांच्या कार्यशैलीकडे शिरूर तालुका लक्ष ठेवून आहे. हे निश्चित आहे.