पुणे -जनावरांच्या लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतींवर राज्य शासनाने बंदी घातली होती. आता शासनाने यामध्ये सुधारणा केली आहे. तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांकडील अभिप्राय मिळाल्यानंतरच शर्यतींना परवानगी देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे शर्यती सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 मध्ये सुधारणेची अधिसूचना राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सयव्यवसाय विभागाने काल जारी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरवणे आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देऊ शकतात असे नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये बैलगाड्यांचे शर्यतीस परवानगी देण्याबाबत अधिकार यापूर्वीच प्रदान केलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी कोणताही प्राणी बाजार भरवणे तसेच प्राण्यांच्या शर्यतीस परवानगी देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दि. 16 डिसेंबर 2017 रोजी दिलेल्या निर्णयानुसार घटनापीठाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून कार्यवाही करावी. शासनाने दिलेल्या नियम व अटींचे पालन करून शर्यतीस परवानगी देण्याची कार्यवाहीच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.