पुणे -“एनडीए’मध्ये महिला कॅडेट्सना प्रवेश देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे मत नौदल प्रमुख अडमिरल आर. हरी कुमार यांनी व्यक्त केले. तसेच नैदलामध्ये “अग्निवीर’ योजनेअंतर्गत तीन हजार रिक्त पदे भरण्यात येणार असून, त्यासाठी दहा लाख अर्ज आले आहेत. त्यापैकी 82 हजार अर्ज महिलांचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 143 व्या दीक्षांत संचलन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नौदल प्रमुख अडमिरल आर. हरी कुमार उपस्थित होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
नौदल प्रमुख हरी कुमार म्हणाले, नौदलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी सरकारचे पाठबळ मिळत असून भारतीय नौदलात विविध लढाऊ जहाजे दाखल होत आहेत. नौदलाचा स्वयंपूर्णतेवर विश्वास असून, त्या अनुषंगाने आधुनिकीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे, असे सांगत त्यांनी नौदलाच्या आधुनिकीकरणाच्या योजनांविषयी माहिती दिली.
नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रांत ही भारतीय बनावटीची पाहिली युद्धनौका दाखल झाली आहे. “आयएनएस विक्रांत’ च्या समुद्री चाचण्या या पूर्ण झाल्या आहेत. पण, अजून पूर्णपणे हे जहाज नौदलात समाविष्ट होण्यासाठी जहाजावर काही चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांसाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो. या चाचण्या पुढील वर्षातील मान्सूनपर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास नौदलप्रमुख अडमिरल आर. हरी कुमार यांनी व्यक्त केला.