बारामती/ जळोची – शरद पवार यांच्याकडे 18 तास काम करण्याची दूरदृष्टी आहे. पण आत्मकेंद्री राजकारणामुळे ते मागे पडल्याची टीका बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. बारामती हे मतदारसंघाचे नाव बदलून ते पुणे दक्षिण असे करावे, अशी आग्रही मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे उपस्थित होते.
शिवतारे म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघात विकासकामांचा असमतोल दिसून येतो. खासदारांनी केंद्राकडून एएसआयसी हॉस्पिटल बारामतीसाठी मंजूर करून आणले. वास्तविक त्यासाठी पुरंदर अथवा खेड शिवापूर हे मध्यवर्ती ठिकाण ठरले असते. प्रत्येक विकासाची बाब बारामतीला आणली जात आहे. दौंड, इंदापूर, भोर, पुरंदरवर अन्याय होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रेल्वेची कनेक्टीव्हीटी असलेल्या दौंडमध्ये झाले असते तर मोठ्या प्रमाणात तेथील विकास झाला असता; परंतु ते होऊ दिले नाही. बारामती बस स्थानकासाठी 220 कोटी मिळतात; परंतु फुरसुंगी, उरुळी देवाची पाणी योजनेसाठी येथील नेतृत्वाने 25 कोटी मिळू दिले नाहीत. आता सत्तांतरानंतर तो निधी आम्हाला मिळाला. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रवर्गाला आपला अधिकार मिळाला पाहिजे. तो मिळाला की लागलीच निवडणुका होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमच्यावर गद्दारीचा आरोप, पण…
आमच्या पक्षावर सातत्याने गद्दारीचा आरोप केला जात आहे. खोके सरकार म्हणून खिल्ली उडविली जात आहे. अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडल्यानंतर सध्याच्या सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही आता गावोगावी जात आहोत. मागील निवडणूक भाजप-शिवसेनेला स्पष्ट कौल दिला असताना उद्धव ठाकरे यांनी राजकीय स्वार्थापोटी कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे खरे गद्दार कोण हे जनतेला कळाले आहे.
विमानतळाबाबत प्रक्रिया लवकर सुरू
पुरंदरच्या पारगावला आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याची प्रक्रिया आता वेग घेईल. विमानतळासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. मध्यंतरी मविआ सरकारच्या काळात पुरंदर, बारामतीच्या सीमेवरील जागा निश्चित करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु विमानतळ हे पारगाव परिसरातच होईल. तेथील शेतकऱ्यांकडून स्वेच्छा खऱेदी केली जाईल. अथवा भूसंपादन करून जागा घेतली जाईल. यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असून, लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
अद्याप 39 गावे पाण्याविना
बारामतीचा विकास म्हणजे शहराचा विकास आहे का, तालुक्यातील 39 गावे अद्याप पाण्याविना आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या वाढदिनी त्यांनी घरावर काळे झेंडे फडकावले होते. पंतप्रधानांसह मोठे नेते आणत शहर व परिसराचा विकास दाखवला जातो. प्रत्यक्षात तालुक्याचा विकास झाला आहे का?