सातारा – आंतरराष्ट्रीय भरडधान्य म्हणून 2023 वर्ष घोषित झाले असून याचे औचित्य साधून कुसुंबी (ता. जावळी) ग्रामपंचायतीने प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत ठराव घेऊन कुसुंबी गाव “नाचणीचे गाव’ म्हणून घोषित व्हावे अशी मागणी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्याकडे या मागणीबाबत पाठपुरावा केला आहे.
आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचे औचित्य साधून ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या मान्यतेने कसुंबी गाव नाचणीचे गाव म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला. कुसुंबीचे सरपंच मारूती चिकणे, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बचत गटाचे सदस्यांनी श्री. ज्ञानेश्वर खिलारी यांची भेट घेऊन कुसुंबी “नाचणीचे गाव’ म्हणून जाहीर व्हावे अशी मागणी केली. या गावातील लोकांची उपजिविका शेतीवर अवलंबून असून या गावामध्ये नाचणी व वरी या भरडधान्याचे उत्पादन घेतले जाते. नाचणीच्या तीन पारंपरिक स्थानिक जातींचे उत्पादन व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून घेण्यात येणार आहे.
कुसुंबी गावातील महिला बचत गटांकडून नाचणीपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जातात. या पदार्थांच्या विक्री व्यवस्थेमध्ये मदत व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. कुसुंबी गावामध्ये शेती सोडून इतर कोणतेही साधन नसल्यामुळे गावामधून शेतकऱ्यांचे स्थलांतर शहराकडे होत आहे. हे स्थलांतरण थांबविण्यासाठी गावाचा हा प्रयत्न आहे. गावाची ओळख “नाचणीचे गाव’ म्हणून निर्माण झाल्यास कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे. तसेच नाचणीपासून बनविलेल्या उपपदार्थांची विक्री करुन गावातील गरजू, बेरोजगार मुलामुलींना रोजगार मिळणार असल्याचे ग्रामस्थांनी श्री. खिलारी यांच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार प्रशासनाच्यावतीने सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही श्री. खिलारी यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागास कुसुंबी गावामध्ये विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी कुसुंबी गावास भेट देऊन कृषी विभागाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती ग्रामस्थांना दिली.