मुंबई – शिवसेनेत फूट पडल्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पक्ष बांधणीसाठी शिवसंवाद यात्रा सुरु केली. ठाकरे गटात आलेल्या सुषमा अंधारे यांनी देखील या यात्रेद्वारे भाजपसह शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. या यात्रेदरम्यान नाशिकमधील शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी नाशिकच्या विकासाबाबत भाष्य केले. यावेळी नाव न घेता आदित्य ठाकरेंनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील भाष्य केल्याचे दिसून आले.
नाशिक हे माझं आवडत शहर आहे. मी नाशिकला नेहमीच येत असतो यापूर्वीही वडिलांसोबत तसेच आजोबांसोबत मी नाशिकमध्ये आलेलो आहे अशी आठवण आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितली. नाशिक आणि कोल्हापूर ही दोन्हही शहर चांगली हिरवीगार आणि प्रगत आहेत परतू गेल्या दहा वर्षांपासून नाशिक प्रगतीच्या बाबतीत कुठे तरी हरवलेलं आहे. अगोदर ब्लु प्रिंट आली ती कुठे गेली समजलं नाही असा टोला आदित्य ठाकरेंनी यावेळी नाव न घेता राज ठाकरेंना लगावला.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले,”नंतर नाशिक शहराला कोणीतरी दत्तक घेतलं, त्या योजनेचं काय झालं ? असा सवालही ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. एका चांगल्या शहराची दहा वर्ष वायाला घालवली अशी खंत देखील ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली. तसेच माझ्याकडे ब्लु प्रिंट वेगैरे आहे असं मी म्हणणार नाही,मी काही दत्तक घेतोय असंही मी सांगणार नाही,तेवढा मी मोठा नाही मात्र संधी मिळाली तर नाशिकचं सोन करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येत राहीन असा विश्वास आदित्य ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.