– राजेंद्र काळभोर
लोणी काळभोर -एप्रिल महिन्यात गुलटेकडी येथील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊ घातली आहे. तब्बल 19 वर्षानंतर ही निवडणूक होणार असून इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. पुणे विभागीय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनामुळे गुलटेकडी येथून पूर्वीप्रमाणेच हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार हाकला जाणार आहे. तब्बल 19 वर्षांच्या वनवासानंतर हवेलीकरांना सभापती, उपसभापती व संचालक म्हणून बाजार समितीच्या कार्यालयात जाणार असल्याची स्वप्ने पडू लागली आहेत.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे, खडकी, देहुरोड कॅन्टोन्मेंट आणि हवेली तालुक्यातील सर्व गावांचा समावेश आहे. वरील निर्णयामुळे आशिया खंडात सर्वात मोठी बाजार समिती असा नावलौकिक असणाऱ्या हवेली कृषी बाजार समितीची सत्तासुत्रे तब्बल 19 वर्षानंतर हवेलीकरांच्या हाती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारात अनियमितता असल्याच्या कारणावरुन, 19 वर्षापुर्वी तत्कालिन सरकारने बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करुन बाजार समितीवर प्रशासक नेमला होता. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात तब्बल दहा वर्षे विविध कारणे पुढे करत प्रशासक कारभार पाहत होता. आता बाजार समितीवरील प्रशासकराज संपणार आहे. एप्रिल महिन्यात निवडणूक झाल्यावर बाजार समितीची सत्ता लोकनियुक्त संचालक मंडळाच्या हाती येणार आहे.
मविआ एकत्र लढणार का?
महाविकास आघाडीतील पक्ष हि निवडणूक एकत्र लढवणार कि वेगवेगळे? यावर सत्तेचा लंबक कुणीकडे झुकणार, हे बरेच अंशी अवलंबून राहणार आहे. काही झाले तरी बाजार समितीची निवडणूक लढवायची असा निर्धार केलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली आहे.
भाजपची ताकद वाढली
आगामी काळात होणाऱ्या या निवडणुकीसाठी पडद्या मागील हालचालींना वेग आला असून प्रत्येक इच्छुक उमेदवार आपला मोहरा पुढे सरकवण्याचा प्रयत्न करत आहे. पुर्वीच्या काळात हवेली बाजार समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वरचष्मा असायचा. त्यावेळी भारतीय जनता पक्ष सहकारात ताकदवान नव्हता. आता मात्र पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे. भाजपची हवेली तालुक्यात चांगली ताकद वाढली आहे.
राष्ट्रवादीमध्ये असताना जिल्हा बॅन्क, यशवंत सहकारी साखर कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी ठिकाणी पदाधिकारी असलेले बरेच नेतेमंडळी सध्या भाजपमध्ये आहेत. जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत प्रदीप कंद विजयी झाल्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणूकीत भाजपला कमजोर समजणं राष्ट्रवादी कॉंग्रेसला जड जाणार आहे.