– सचिन सुंबे
सोरतापवाडी -नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांकडे भावी उमेदवारांचे लक्ष लागले आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घोषित होण्याच्या आशेवर भावी उमेदवारांमध्येमध्ये उत्साह संचारला असून पुर्व हवेलीतील अनेक गावांत आपणच भावी उमेदवार असल्याचे इच्छुक सांगत असल्याने पूर्व हवेलीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीची लगबग वाढली आहे.
गावागावांना अनेक नेते, भावी उमेदवार भेटी देत असून विविध कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. मतदारांना आपणच भावी उमेदवार असल्याचे स्वतःहून सांगत आहेत. बरेच महिने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विविध कारणांनी लांबल्याने भावी उमेदवारांमध्ये निरुत्साही होता; परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुका होताच इच्छुकांमध्ये उत्साह वाढला आहे.
सर्व उमेदवार तयारीला लागले असुन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकर जाहीर होणार या आशेवर सर्व पक्षातील इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झाली आहे. सर्व पक्षातील भावी उमेदवार सावधपणे व्यूहरचना करताना दिसत आहेत.
नुकत्याच झालेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी विरोधी पॅनलचे पानिपत केल्याने पूर्व हवेलीत उत्साह संचारला आहे.
इच्छुक सावध भूमिकेत
सर्व पक्षातील इच्छुकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार? उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करावी का? यासारख्या असंख्य प्रश्न भावी उमेदवारांपुढे असल्याने ते प्रत्येक गोष्ट तोलून मापूनच बोलत आहेत.
पक्षांसह गावपुढाऱ्यांचा लागणार कस पूर्व हवेलीत राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी देऊन इतरांना शांत करणे पक्षाला जिकिरीचे होणार आहे.
त्यापाठोपाठ शिवसेना (दोन्ही गट), भाजप व कॉंग्रेस पक्षात उमेदवारी मागणारे पण आहेत. सर्व पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने धावत्या लगबगीमध्ये पक्षांसह गावपुढाऱ्यांचा कस लागणार आहे.
“अभी नहीं तो कभी नहीं’
एका पक्षाततून उमेदवारी नाही मिळाली तर दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढण्याच्या तयारीत काही इच्छुक उमेदवार आहेत, त्यामुळे सर्व पक्षातील उमेदवारांना शांत करणे मोठे आव्हान असणार आहे.
कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचनपर्यंत अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढण्यासाठी तयार असून “अभी नहीं तो कभी नहीं’ या नाऱ्यानुसार उमेदवारी मिळविण्यासाठी उमेदवारांची पळापळी आतापासुनच सुरू झाली आहे.