मंचर – आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे मुक्तादेवी यात्रा उत्सवानिमित्त गुरुवारी (दि. 1) झालेल्या बैलगाडा शर्यतीत माजी आदर्श सरपंच गोविंद खिलारी यांचा बैलगाडा घाटाचा राजा किताबाचा मानकरी ठरला आहे. अशी माहिती यात्रा कमिटीचे संयोजक आणि भकमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर यांनी दिली.
लंपी आजाराचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर प्रशासनाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली असून, प्रथमच खडकी येथे शर्यतीचा थरार रंगला आहे. मुक्तादेवी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत रविवारपर्यंत (दि. 4) होणाऱ्या बैलगाडा शर्यतीत तब्बल 815 बैलगाडा मालकांनी नोंदणी केली आहे. ही यात्रा चार दिवस चालणार आहे.
शर्यतीच्या पहिल्या दिवशी जिजाबा दगडू वाघमारे, सगाजी पाटील व सरपंच नारायण बांगर यांच्या हस्ते शर्यतीच्या घाटाचे उद्घाटन झाले. प्रथम क्रमांकात खेड येथील अजिंक्य सुधीर खांडेभराड यांचा बैलगाडा फळीफोड ठरला, द्वितीय क्रमांकात सावरगाव येथील शिवाजीराजे बबनराव चिकणे, तर तृतीय क्रमांकात गुंडाळवाडी येथील संतोष अनंता भोर यांचे बैलगाडे फळीफोड ठरले आहे.
माजी महापौर राहुल जाधव, भाजपाचे संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक अंकित जाधव, माजी संचालक संजय बाणखेले, उद्योजक बाबाजी टेमगिरे यांनी यात्रेला भेट दिली. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याचे स्वीय सहाय्यक भिवसेन भोर, दत्ता हगवणे, बाळासाहेब पोखरकर, दत्ता भोर, यात्रा कमिटी अध्यक्ष विशाल वाबळे, अभिषेक वाबळे, माजी सरपंच अशोक भोर आदींनी यात्रेची व्यवस्था पाहिली. निशाणाची जबाबदारी बाबूराव शिंदे यांनी पार पाडली. ही यात्रा रविवारपर्यंत सुरू राहणार आहे.