जेजुरी -महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत माघ पौर्णिमेचा शिखरी काठी उत्सव उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला. रणहलगीसह पारंपरिक वाद्यांचा ताल, भंडार-खोबऱ्याची उधळण आणि विविध रंगीबेरंगी कापड, गोंडे आणि मोरपिसांनी सजविलेल्या शिखरी काठ्या यातूनच बहुरंगी -बहुढंगी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन येथे घडत होते.
यंदा कळसाला शिखरी काठी टेकविण्याचा मान संगमनेरकर होलम राजाच्या शिखरी काठीचा होता. त्यामुळे चिंचेच्या बागेत निवासी असलेल्या होलमराजा शिखरी काठीने सकाळी 9 वाजण्याचे सुमारास नगरप्रदक्षिणेसाठी प्रस्थान ठेवले. त्यांच्यासमवेत स्थानिक इंदौरकर नरेश होळकर शिखरी काठीसह इतर सुमारे 15 प्रासादिक शिखरी काठ्या होत्या. खोमणे पाटील, माळवदकर पाटील यांनी सर्व शिखरी काठीतील भक्तांचे स्वागत केले.
त्यानंतर सकाळी 11च्या सुमारास शिखरी काठ्या गडावर दाखल होत. भंडाराच्या-खोबऱ्याच्या उधळणीत कळसाला टेकवण्यात आल्या. तर नगरप्रदक्षणा व चावडीमध्ये पाटलांचा सन्मान स्वीकारून सुपेकर खैरे पाटील यांची शिखरीकाठीसुमारे 10 ते 12 प्रासादिक शिखरी काठ्या दुपारी 1 वाजता गडावर दाखल होत त्यांनीही कळसाला टेकवत मान दिला.
यावेळी पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. देवसंस्थानच्या वतीने मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, संगणक विभागप्रमुख संतोष खोमणे, पर्यवेक्षक गणेश डिखळे यांनी शिखरी काठीतील मानकऱ्यांचा सन्मान केला.