गणेशमूर्ती घेऊन घरी परतण्याची भाविकांवर वेळ : मनपाचा नियोजनशून्य कारभार
पुणे – शहरात बुधवारी दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन केले जात होते. पण, नदीपात्रातील नाना-नानी उद्यानासमोरील विसर्जन हौदात अस्वच्छ पाणी तसेच कचरा असल्याने अनेक भाविकांनी तेथे मूर्ती विसर्जन न करता ती पुन्हा घरी नेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला.
दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनासाठी अनेक नागरिक महापालिकेच्या आवाहानला प्रतिसाद देत नाना पार्क तसेच अमृतेश्वर विसर्जन घाटाजवळ हौदात विसर्जनासाठी मूर्ती घेऊन आले. मात्र, या हौदात पाणी तळाला होते. तसेच ते गढूळ आणि कचरा होता. नंतर नागरिकांनी तक्रार केल्यावर हौदात पाणी सोडण्यात आले. मात्र, त्यात घाण असल्याने ती तरंगत वर आली. परिणामी, नाराज झालेल्या गणेश भक्तांनी घरी अथवा इतर ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आम्ही शाडूच्या मातीची मूर्ती आणली. मूर्ती विसर्जनासाठी आम्ही हौदाकडे गेलो. मात्र, प्रत्यक्षात हौदात घाण पाणी, कचरा होता. त्यामुळे आम्ही घरीच विसर्जनासाठी जात आहोत. महापालिकेने अशा प्रकारे आमच्या भावनांशी खेळू नये.
– एक गणेश भक्त