“मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’ येथे व्याख्यान
पुणे – “उद्योग हा सगळ्यांच्या फायद्यासाठी करावा’ या तत्वावर भारतीय अर्थव्यवस्था आधारित आहे. आपण उद्योगाचे मालक नसून, आपण इतरांसाठी काम करतो तसेच आपण केवळ विश्वस्त आहोत असा विचार मनात ठेवून काम करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकतेच केले.
“मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर’ (एमसीसीआयए) संस्थेने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी “भारतीय अर्थविषयक धोरणांविषयीचे तत्वज्ञान’ याविषयावर विचार मांडले. यावेळी “एमसीसीआयए’चे अध्यक्ष दीपक करंदीकर, संस्थेचे महासंचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते.
भारतीय अर्थव्यवस्थेमागील तत्वज्ञान इतर देशांपेक्षा वेगळे आहे. असे सांगून डॉ. भागवतांनी भरपूर उत्पादन, संयमित उपभोग आणि विकेंद्रित उत्पादनावर भाष्य करताना इतिहासकालीन अर्थव्यवस्थेचे दाखले दिले. भारतीय उद्योगाचा पाया हा आपल्याबरोबर समाजाचा फायदा पाहण्यावर आहे. जसे एखादा शेतकरी स्वतःसाठी अन्नधान्य पिकवत नाही, तर तो समाजासाठी शेती करतो. त्याप्रमाणे उद्योगजगतानेसुद्धा व्यापक दृष्टिकोन
ठेवून समाजाच्या भल्याचा विचार करावा. कारण समाजाच्या भरभराटीतच वैयक्तिक भरभराट दडलेली आहे. औद्योगिकीकरण, शाश्वत ऊर्जेचा वापर, आणि उद्योगात मानवीय दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. संपत्ती ही केवळ पैशात न मोजता बुद्धीची संपत्ती ही तितकीच महत्त्वाची आहे, हा भारतीय संस्कृतीतील विचार आपण विसरता काम नये.
संपत्तीचा विनियोग कसा करावा ह्याबद्दल बोलताना डॉ. भागवत यांनी सहा भागांमध्ये ती कशी सारख्या प्रमाणात वापरावी याविषयी माहिती दिली. त्यामध्ये स्वतःच्या उपभोगासाठी, भविष्याची तरतूद, धार्मिक कार्यांसाठी, समाजासाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि निकडीच्या प्रसंगांसाठी संपत्तीचे समान भाग करावेत, असे डॉ. भागवत म्हणाले. गिरबने यांनी आभार मानले. यावेळी व्याख्यानास विविध क्षेत्रांतील अभ्यासकांचीही उपस्थिती होती.