सिंहगडरस्ता (जयंत जाधव) सिंहगड रस्ता येथील नवीन प्रभाग क्र. अनुक्रमे 51, 52, 53, 54 आणि जुना प्रभाग यामध्ये प्रभाग रचनेनंतर मोठा फरक झाला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांचा गोंधळ उडाला असून निवडणूक नक्की कोणत्या प्रभागातून लढवायची? असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे.
जे काही उमेदवार प्रभागाच्या कुंपणावरचे आहेत, त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तिकडे जावे की इकडेच थांबावे, या संभ्रमात अनेकांची गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
खडकवासला मतदारसंघ हा एकेकाळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा होता. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अगदी थोड्या फरकाने पराभव झाला होता. एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात इतर पक्षांचेही अस्तित्व जाणवू लागले आहे. आनंदनगर, सनसिटी, माणिकबाग, वडगाव, धायरी, नांदेड याभागात “आरएसएस’चे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याने भाजपला हा प्रभाग अनुकूल असल्याचे चित्र सध्या तरी आहे. परंतु, अन्य पक्ष भाजपा पुढे यावेळी मोठे आव्हान निर्माण करण्याच्या तयारीत आहेत.
भाजप इच्छुक उमेदवाराने सांगितले की, नव्या प्रभाग रचनेवर आम्ही हरकती घेणार आहोत तसेच यासंदर्भात न्यायालयातही जाणार आहोत. कारण, समाविष्ट 11 गावे जी घेतली आहेत, त्यांचेही दोन-तीन तुकडे झाले आहेत. जे इच्छुक उमेदवार अनेक वर्षांपासून तयारी करीत होते, त्यांना कोणत्यातच प्रभागात संधी मिळालेली नाही. म्हणजे काम एका प्रभागात आणि तो भाग गेल्या दुसऱ्या प्रभागात, अशी स्थिती झाली आहे.
सध्याची जी नवीन प्रभाग रचना आहे, ती राष्ट्रवादीने त्यांच्या फायद्यासाठी आणि 2024 खासदारकीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्याची चर्चा आहे. परंतु, असे असले तरी निवडणुकीच्या तिकिटासाठी खरी चुरस भाजपमध्ये दिसून येते. कारण, अगोदर चारचा प्रभाग आता तीनचा झाला आहे, त्यामुळे विद्यमान नगरसेवकांपैकी एकाला नारळ मिळण्याची शक्यता आहे. जे इच्छुक अनेक वर्षांपासून तयारी करीत आहे तेही आपला दावा त्या प्रभागावर सांगत आहेत, यासाठी फ्लेक्स सोशल मीडियावर “दावेगिरी’ जाहीर केली जात आहे. तसेच, जेथे जिंकण्याची शक्यता जास्त तेथे बंडखोरीचीही शक्यता अधिक असल्याने तिकीट वाटपात राजकीय पक्षांचा कस लागणार आहे.
महिलांसाठी राखीव आणि आरक्षण…
मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये असली तरी मित्र पक्ष कॉंग्रेस आणि शिवसेना यांचाही विचार व्हायला पाहिजे. कारण, राष्ट्रवादीचे प्रभाग रचनेवर प्राबल्य दिसत आहे. कॉंग्रेस, शिवसेना यांचे इच्छुक उमेदवार आता पक्ष काय भूमिका घेतो, याकडे लक्ष ठेवून आहेत आता, हरकतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय आरक्षणाची ही वाट पहावी लागेल. महिलांसाठी जागा राखीव किती आणि ओबीसी राखीव किती, यावही पुढचे चित्र अवलंबून आहे.