नदीपात्रात झुडपे, राडारोड्याचे ढीगच ढीग
पुणे – पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेकडून शहरातील नाल्यामधील गाळ काढणे तसेच सफाईचे काम हाती घेतले आहे. मात्र, खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर सर्वात आधी पूर येणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरातील एकतानगरीच्या बाजूच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात झुडपे तसेच राडारोडा पडला आहे.
अद्याप तो उचललेला नाही. त्यामुळे नदीच्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन या भागात पुन्हा पूरस्थिती उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, वाढलेल्या झुडपांमुळे या भागात डासांचा उपद्रवही वाढला आहे.
विठ्ठलवाडी भागात अनेक सोसायट्या नदीपात्राच्या बाजूला आहेत. खडकवासला धरणातून 25 ते 35 हजार क्युसेकपर्यंत पाणी सोडल्यानंतर या ठिकाणी काही भागात पुराचे पाणी घुसते. मात्र, नदीपात्रात यावर्षी झुडपे वाढलेली असून पावसाचे पाणी आल्यानंतर या झुडपांना कचरा तसेच जलपर्णी अडकण्याची शक्यता आहे.
त्यातच, या ठिकाणी अद्यापही नदीपात्रातील रस्ता उघडल्यानंतर तसेच बाहेरूनही राडारोडा आणून टाकलेला आहे. त्यामुळेही पाण्यास अडथळा निर्माण होऊन पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासनाने तातडीने या भागातील झुडपे तसेच राडारोडा काढून घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कर्वेनगर बाजूला सर्वत्र राडारोडा
विठ्ठलवाडीच्या बाजूला झुडपे तसेच घाणीचे ढीग असतानाच, कर्वेनगरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून नदीपात्रावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पलिकडील बाजूला पाण्याला अडथळा निर्माण होऊन या पाण्याचा फुगवटा अलीकडील बाजूस येऊन या भागातील पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे.