पुणे – जीवनात विविध प्रकारची संकटे, आव्हाने येत असतात. त्यांचा सामना केल्यासच आयुष्यात यश मिळते, असे मत पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. डी. जी. देशकर यांनी व्यक्त केले आहे.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ. आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील बुद्धिस्ट सेंटरच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पांडकर होते. बुद्धिस्ट सेंटरचे समन्वयक प्रा. डॉ. गौतम बनसोडे यांच्यासह अन्य शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कार्य आत्मसात करण्याची गरज निर्माण झालेली आहे. समाजाने आपल्याला घडविल्यानंतर समाजासाठी काही तरी करण्याचा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे. समाजाची परतफेड करण्याची वृत्ती अंगी बाळगत समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. संस्था, संघटना यांच्याशी एकनिष्ट राहून कामे करण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. डी. जी. देशकर यांनी सांगितले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार-विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज पांडकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. गौतम बनसोडे यांनी करुन दिली. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा कांबळे यांनी केले. आभार प्रा. संपत शिंदे यांनी मानले.