पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चार धरणांत मिळून सध्या 18.82 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल 3.29 टीएमसीने हा पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे शेतीसाठी आर्वतन, शहराला पिण्यासाठी लागणारे पाणी, उन्हाळ्यातील बाष्पीभवन या सर्वांचा विचार करून जलसंपदा विभागासह मनपा प्रशासनाला पाण्याचे नियोजन करताना आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
यंदा जेमतेम झालेल्या पावसामुळे ही चारही धरणे कशीबशी 100 टक्के भरली. मात्र, त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने धरणात पुन्हा पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे सद्यस्थिती पाहता, महानगरपालिकेने नियंत्रित पाणीवापर केल्यास उन्हाळी हंगामात चारा पिके व ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी देणे शक्य होईल, अशी भूमिका जलसंपदा विभागाने कालवा समितीच्या बैठकीत मांडली होती.
त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता शहरात पाणी पुरवठ्यात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचवेळी पुणे महापालिकेने पाणी जपून वापरावे, अशा सूचना दिल्या होत्या. दरम्यान आता कालवा समितीची बैठक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून पाणीवाटपाचे फेरनियोजन केले जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
धरणाचे नाव – उपलब्ध पाणीसाठा – टक्केवारी
खडकवासला – 1.11 टीएमसी – 56.22 टक्के
पानशेत – 8.71 टीएमसी – 81.74 टक्के
वरसगाव – 8.51 टीएमसी – 66.34 टक्के
टेमघर- 0.50 टीएमसी – 13.54 टक्के
आर्वतनामुळे टेमघर धरण रिकामे
सध्यस्थितीत खडकवासला धरणातून मागील दीड महिन्यांपासून शेतीसाठीचे आर्वतन सुरू आहे. सध्या खडकवासला धरणातून 800 क्यूसेकने कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येत आहे. आर्वतन सोडण्यासाठी यंदा टेमघर धरणातून आधी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे यंदा टेमघर धरण हे रिकामे झाले असून धरणात अवघा अर्धा टीएमसी इतका पाणीसाठा शिल्ल्क आहे.