वडगाव मावळ (किशोर ढोरे)- सातबारा उताऱ्यांचे डिजिटलायझेशन झाल्यानंतर मावळतील 692 सातबारा उताऱ्यावरील नावे व क्षेत्र चुकीचे आल्याच्या तक्रारी मावळ तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने मावळ तहसीलदार यांनी संबंधितांच्या तक्रारींवर सुनावणी घेऊन आतापर्यंत 247 सातबारा उताऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तर उर्वरित 445 सातबारा उताऱ्यांच्या दुरुस्तीचे काम तहसीलदार यांच्याकडून सुनावणी घेऊन करण्यात येत आहे.
हस्तलिखित सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र आणि डिजिटल सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र यातील तफावत त्याचबरोबर सातबारा उताऱ्यावरील नावांमध्ये चुका अशा अनेक त्रुटी सातबारा उताऱ्यांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे डिजिटल सातबारा उतारा मधील तलाठ्यांच्या चुकांचा नाहक त्रास होणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. याआधी सातबारा उताऱ्यातील चुका दुरुस्तीचे अधिकार तलाठ्यांना होते; परंतु आता ते तहसीलदारांकडे आले आहेत. सातबारा बिनचूक व्हावेत, हे तपासण्याची जबाबदारी नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्यावर सोपवण्यात आली होती. तहसीलदारांना मात्र शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यात असलेल्या त्रुटी दुरुस्ती करण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून येते. कारण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातबारा डिजिटल होऊनही त्यामध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने विशेषत: शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे सातबारा दुरुस्तीबाबत तक्रारी घेऊन गेल्यानंतर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून देखील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचेदेखील दिसून येत आहे.
सातबारा उतारे डिजिटल करतेवेळी ऑनलाइन माहिती भरताना तसेच पूर्वीच्या काही हस्त लिखित सातबारा उताऱ्यांमध्ये देखील चुका असल्याने या त्रुटी आढळून येत आहेत. या संदर्भात संबंधितांनी केलेल्या तक्रारींवर सुनावणी घेऊन सातबारा उतारे दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे. – मधुसुदन बर्गे, तहसीलदार, वडगाव मावळ