वडगावशेरी –वडगावशेरी येथील गणेशनगरच्या सहा नंबरच्या लेंनधील 500 ते 700 घरांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील नागरिकांना पोटाच्या विकारांनी ग्रासले आहे. यामध्ये नवजात बालके आणि लहान मुलांचा समावेश आहे.
गणेशनगर भागातील सागर पार्क, पाचवा मैल आणि अन्य भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची लाइन टाकण्यात आली आहे. या लाइन शेजारून ड्रेनेजलाइन टाकण्यात आली आहे. प्रशासनाच्या एका कामात ही लाइन फुटली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, आश्वासन देण्यापलीकडे प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या परिसरात पाणी पुरवठा सुरू करताच दूषित पाणी येत आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पुराव्यासह तक्रार केली होती. मात्र, दुरुस्तीसाठी तारीख पे तारीख देण्यात येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत प्रशासनाशी आतापर्यंत अनेकवेळा संपर्ग साधला आहे. याशिवाय प्रशासनाला निवेदनेही दिली आहेत. मात्र, प्रशासनाने कोणतीही पावले उचललेली नाहीत. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत याबाबत कार्यवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– उषा कळमकर, माजी नगरसेविका
दूषित पाण्यासंदर्भात नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. याशिवाय होणाऱ्या परिणामांची जाणीवही करून दिली होती. मात्र, कोणीही दखल घेतली नाही, त्यांचा हा हलगर्जीपणा आमच्या जीवावर बेतत आहे. यापुढील काळात अन्याय करणार नाही.
– मनीषा बनकर, गृहिणी