आंबेगाव बुद्रुक : मनस्वी सोसायटीपर्यंत तयार असलेला रस्ता
संतोष कचरे
आंबेगाव बुद्रुक – स्मार्ट सिटी अंतर्गत पुणे शहराचा विकास होत असताना उपनगरांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. आंबेगाव बुद्रुकचा काही भाग १९९७ तर काही भाग २०१७ मध्ये पालिकेत समाविष्ट करण्यात आला. या भागाचा विकास आराखडा मंजूर झाला त्यात डीपी रस्तेही नकाशावर दिसत आहेत. परंतु, ते केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात रस्ते कधी विकसित होणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, नऱ्हे या भागाचे मोठे नागरिकरण झाले आहे. परिणामी, या भागात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न असून डीपी रस्ते झाले नसल्याने दत्तनगर चौकात व भूमकर चौकात कायमच वाहतूक कोंडी होत आहे. दत्तनगर चौक ते आंबेगाव दरम्यान दोन डीपी रस्ते मंजूर आहेत. कात्रज बाह्यवळण रस्त्याला जोडणारे असल्यामुळे सदर रस्ते झाले तर दत्तनगर चौकातील वाहतूक कोंडी फुटू शकेल. आंबेगाव, नऱ्हेकडे जाणारे नागरिक पर्यायी डीपी रस्त्याचा वापर करतील.
रामनगरी, मनस्वी सोसायटीजवळील रस्ता केवळ पालिकेच्या उदासीन धोरणामुळे विकासीत झालेला नाही. या ठिकाणी १५ गुंठे मोकळी जागा असतानाही सदर जागा पालिकेकडून हस्तांतर केली गेलेली नाही. या जागेत झाडे झुडपे वाढली आहेत. फरशी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात फरशीचे तुकडे टाकून डोंगर तयार केला आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असून एका व्यक्तीसाठी लाखो लोकांना वेठीस धरले जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आंबेगाव, दत्तनगर रोड व कात्रज बाह्यवळण रस्ता दोन्ही बाजूने तयार आहे. रामनगरी सोसायटीजवळ मोकळ्या खासगी जागेतून रस्ता करण्यासाठी सदर जागा हस्तांतरित करण्याची आवश्यकता आहे. इतर वेळी रस्ते विकासासाठी इमारतीही पडणाऱ्या पालिका प्रशासनाला सदर जागा का मिळत नाही, हा प्रश्नच आहे. महापालिका समावेशनांत्तर हा भाग विकासाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
“डीपी रस्ते झाले नसल्यामुळे आंबेगावचा श्वास कोंडत आहे. महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी कागदावरील कामे प्रत्यक्षात केली तर आंबेगावचा सर्वांगिण विकास साधता येईल.” – संतोष ताठे, माजी सरपंच, आंबेगाव बुद्रुक
“महापालिका समावेशानंतर आंबेगावचा विकास ज्या गतीने होणे आवश्यक होते त्या गतीने झालेला दिसून येत नाही. विकास आराखड्यानुसार डीपी रस्ते झाले तर दत्तनगर चौकातील कोंडी सुटणार आहे. त्यामुळे पालिका व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.” – दिनेश कोंढरे, माजी उपसरपंच, आंबेगाव बुद्रक