दावडी – कळमोडी धरणाची उंची 1 मीटरने वाढविणे शक्य असून त्याद्वारे 2.75 दलघमी पाणीसाठा वाढणार आहे. त्याबाबत जलविज्ञान नाशिक व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्याही मान्यता लागेल तसेच कळमोडी प्रकल्पाचा प्रथम सुप्रमा प्रस्ताव वाढीव पाणीसाठा व वाढीव क्षेत्रासह सुधारित करून फेरसादर करावा किंवा धरणाची उंची वाढविल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या जादा पाण्यातून अतिरिक्त सिंचन क्षेत्रासाठी स्वतंत्र प्रशासकीय मान्यता करावी, असे अहवालात नमूद आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता कुमार पाटील यांनी दिली असल्याचे कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक टाव्हरे यांनी संगितले.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, वरूडे, वाफगाव तसेच शिरूर तालुक्यातील थिटेवाडी लाभक्षेत्रातील केंदूर, पाबळ परिसरातील गावांची अंतिम मान्यता शासनाने दि. 4 फेब्रुवारी 2020 रोजी नाकारली होती. सर्वेक्षण होऊनही जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मान्यता व तांत्रिक बाबींमुळे मान्यता नाकारली. याबाबत टाव्हरे यांच्या पाठपुराव्यामुळे जलसंपदा विभागाने कार्यकारी संचालक, कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार अहवाल मागिला होता.
हा अहवाल सादर झाला असून त्यामध्ये वेगळी प्रशासकीय मान्यता व महामंडळ स्तरावर बैठक आवश्यक असे निर्देश होते. त्यानुसार दि. 4 ऑक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन केले होते; परंतु अचानक ती बैठक रद्द झाली होती. उपमुख्यमंत्री कार्यालयाने सांगितल्यानंतर शुक्रवारी (दि. 13) पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता कुमार पाटील, कार्यकारी अभियंता एन.एस. कऱ्हे, अशोक टाव्हरे, दलित पॅंथरचे युवा प्रदेशाध्यक्ष शुभम सोनावणे,
कळमोडीचे उपअभियंता पी. बी. शिंदे, उप अधीक्षक अभियंता एन. एल. हेमणे, संस्थेचे पदाधिकारी सुभाष गोरडे, अक्षय गायकवाड, सुनील पवार, दीपक सांडभोर, दिलीप माशेरे, ज्ञानेश्वर साबळे, विलास डफळ, कनेरसरच्या सरपंच सुनीता केदारी, कल्याणी पवार, अशोक साबळे आदी उपस्थित होते.
अशोक टाव्हरे म्हणाले की, दुष्काळी गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे व कळमोडी योजनेत समावेश करावा, तांत्रिक बाबींची पूर्तता करावी, कळमोडी धरणाची उंची वाढवून पाणी उपलब्धता करावी किंवा चास कमान धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेती क्षेत्र औद्योगिकीकरण व नागरिकीकरणामुळे कमी झालेले असल्याने त्याबाबत सर्वेक्षण करावे तसेच कळमोडी धरणाचे चास कमान धरणासाठी राखीव ठेवलेले पाणी उपसा योजनेला देण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करावा, अशी मागणी बैठकीत केली.
अहवाल लवकरच शासनाकडे
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवेदनानुसार खेडच्या पूर्व भागातील गावांना कळमोडी योजनेचे पाणी दिले जावे, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले होते, त्यानुसार अहवाल मुख्य अभियंता जलसंपदा यांना मंडळाने सादर केला आहे, लवकरच शासनाकडे तो अहवाल जाईल, असे अभियंता कुमार पाटील यांनी सांगितले.
फडणवीस तसे निर्देश देतील…
अधीक्षक अभियंता पाटील यांनी शिरूर तालुक्यातील गावांबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवेदनानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दि. 11 ऑक्टोबर रोजी बैठक होती, काही कारणास्तव ती रद्द झाली. लवकरच ती होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस जे निर्देश देतील त्याची कार्यवाही तातडीने केले जाईल असे स्पष्ट केले.तसेच आज झालेल्या बैठकीचा अहवालही पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाकडून शासनास जाणार असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.