वाघोली – पुणे-नगर रस्त्यावर असणार्या वाघोलीची वाहतूक कोंडी सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात भर पडत असून प्रवासी वाहतुकीबरोबर जड वाहनांची संख्या रस्त्यावर जास्त असल्याने वाघोली आणि केसनंदमधील वाहतूक कोंडीने नागरिक संतप्त झाले आहेत. पुणे महानगरपालिका स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने याबाबतीत तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी
पुणे-नगर रस्त्यावर वाघोली ते शिरूर 54 किलोमीटरचा देशातील पहिला तीन मजली उड्डाणपूल होणार असून, या पुलाच्या निमित्त प्रक्रियेला केंद्रीय वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दिल्याने शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते प्रदीप कंद यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.
वाघोलीमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल माजी उपसरपंच संदीप सातव यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त व पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरणाचे आयुक्त यांची भेट घेऊन बाह्यवळण रस्त्यासाठी निधीची मागणी व पाठपुरावा केला आहे. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी देखील वाघोली ते शिरूर तीन मजली रस्त्यासाठी पाठपुरावा केला आहे. वाघोलीच्या बाह्यवळणासाठी देखील अधिकार्यांशी चर्चा आमदार अशोक पवार यांनी देखील केली आहे.
ग्रामस्थ रस्त्यावर उतरले
वाघोली आणि केसनंद मधील वाहतूक कोंडीने दिवसेंदिवस डोके वर काढले असून वाहनांच्या रांगाच रांगा लागत असल्याने वाहतूक नियंत्रण समितीचे मुख्य कार्यवाह संपत गाडे, गणेश तांबे, सनी अन्सारी, जीवन जाधवराव आदी मंडळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास पाटील यांच्या समवेत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक नियंत्रकाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. सततच्या वाहतूक कोंडीने मात्र वाघोलीकर त्रासले आहेत.
गुगल मॅपवरून नागरिकांचा प्रवास वाढला
वाघोली आणि केसनंद मधील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी गुगल मॅप वाहतूक कोंडीची दिशादर्शक माहिती बघून आपला प्रवास सुरू केला आहे. गुगल मॅपचा वापर करून वाघोली आणि परिसरातील नागरिकांनी आपल्या कामाच्या वेळा बदलल्या असल्याने वाघोलीमधील अर्थकारणावर तसेच छोट्या मोठ्या उद्योगांवर याचा मोठा परिणाम दिसून येऊ लागला आहे.
“वाघोली, केसनंद मधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांच्या प्रमुखांसमवेत बैठक आयोजित करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणार आहे.” – रामभाऊ दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य
“वाघोली आणि केसनंदमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी स्थानिक युवकांची मदत होत असून पोलीस यंत्रणेचे देखील सहकार्य लाभत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.” -संपत गाडे, समाजसेवक वाघोली