दौंड – ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार याद्या मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत. दौंड तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारुप मतदार याद्या (दि.1) रोजी प्रसिद्ध केली आहे. या मतदार यादीबाबत सोमवार (दि.7) पर्यंत हरकती घेण्याची मुभा निवडणूक आयोगाकडून दिली आहेत. या चुका दुरुस्तीची मागणी स्थानिक नेते, नागरिकांमधून होत आहे.
दौंड तालुक्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गावातील रहिवासी नसणारे, इतर ठिकाणी रहिवाशी असणाऱ्या अनेकांची नावे या गावातून त्या गावात गेले आहेत. तसेच काही नावे मतदार यादीत असून ते कोणाच्याही परिचयाचे नाहीत. तरीही ती मतदार यादीत आली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराचे प्रदर्शन दिसत आहे.
याद्यांच्या घोळामुळे इच्छुक उमेदवाराला निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची शक्यता आहे. काहींना मतदानाचा हक्कही बजावता येणार नाही. या मतदार याद्या ज्यांनी तयार केल्या आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. सध्या ज्या नागरिकांनी किंबहुना इच्छुकांनी मतदार यादीवर आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, इतर ठिकाणचे आलेली नावे कशी वगळली जाणार, याबाबत प्रशासनाकडून कोणतीच माहिती मिळत नाही.
मतदार याद्यामध्ये ज्या ठिकाणी अशा तक्रारी आहेत. त्यांनी याबाबत हरकती घ्याव्यात. आम्ही त्याबाबत योग्य निर्णय घेणार आहोत. -संजय पाटील, तहसीलदार, दौंड.
सध्या आमच्या गावातही मतदार प्रारूप मतदार यादीत इतर ठिकाणची नावे आली आहेत. ही नावे पहिल्यांदाच आल्यामुळे ते कोणत्या ठिकाणी आहेत, हे माहिती होत नाही. ही नावे तात्काळ रद्द करावी, यासाठी आम्ही अर्ज करणार आहोत. मात्र, निवडणूक आयोगाने अशी चूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी; -ऍड. बापू भागवत, मळद.
मतदार याद्यांचे ज्या खासगी एजन्सीला काम दिले जाते. त्यांच्या माध्यमातून थेट उमेदवारांना संपर्क करून यांमध्ये मोठ्या प्रमाणवर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी.
-अनिल सोनवणे, राहू.