नवी दिल्ली : भारतात केंद्र सरकारकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ब्रिटनमध्येही आंदोलन सुरु करण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये भारतीय दुतावासाबाहेर मोठे आंदोलन करण्यात करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. एवढेच नाही तर खलिस्तानवादी झेंडेही फडकले. याबाबत ब्रिटनच्या लंडनस्थित भारतीय उच्चायोगाने स्पष्टीकरण दिले आहे.
#WATCH: ‘Khalistani’ flags at a protest opposite Indian High Commission, London. The protest was to be against Indian farm laws. https://t.co/YeOWlFwokj pic.twitter.com/Ez5GF3MxzA
— ANI (@ANI) December 6, 2020
भारतीय उच्चायोगाने याविषयी म्हटले आहे की, “हा गंभीर प्रकार आहे. कारण करोना महामारीदरम्यान भारतीय उच्चायोगासमोर ३५०० ते ४००० लोक सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन करत एकत्र आले. सुमारे ७०० वाहनं या रॅलीमध्ये सहभागी झाली होती. उच्चायोगाला याची माहिती होती की, लंडन पोलिसांनी ३० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी दिली नव्हती तसेच या आंदोलनासाठी ४० वाहनांची परवानगी घेण्यात आली होती.या आंदोलनात खलिस्तानी झेंडे फडकवण्यात आले तसेच शेतकऱ्यांच्या समर्थनाबरोबरच भारतविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली असल्याची माहिती एक वृत्तसंस्थेने दिली आहे.
दरम्यान, या मोठ्या आंदोलनाची ब्रिटनच्या परराष्ट्र आणि गृह विभागाने याची दखल घेतली आणि गर्दीवर नियंत्रण मिळवले. यावेळी काही समाजकंटकांना ताब्यातही घेण्यात आले. उच्चायोगाने सांगितले की, ते या प्रकरणावर बारीक नजर ठेवून आहे. विनापरवानगी इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्रित कसे झाले यासह इतर पैलुंची चौकशीही केली जात आहे.
आंदोलनक कोण होते आणि त्यांची मागणी काय होती? यावर स्पष्टीकरण देताना उच्चायोगाने सांगितलं की, “ही गोष्टी स्पष्ट आहे की, हे विभाजनवादी आणि भारतविरोधी लोक होते. जे शेतकरी आंदोलनाआडून आपला भारतविरोधी अजेंडा पुढे नेऊ पाहत होते. कृषी कायद्यांविरोधात भारतात सुरु असलेले आंदोलन हा लोकशाहीचा भाग आहे. यावर भारत सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत आहे. त्यामुळे हे सांगण्याची गरज नाही की हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.”