श्रीकृष्ण गुंजाळ : शिक्रापुरात चासकमान अधिकारी- ग्रामस्थांची बैठक
शिक्रापूर – चासकमान कालव्यातून शेतकरी व ग्रामस्थांना मिळणाऱ्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करुन पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यास कडक उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना पाण्याची जास्त अडचण निर्माण होणार नाहीत, असे चासकमान विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ यांनी सांगितले.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चासकमान कार्यालय येथे नुकतीच चासकमान विभागाचे अधिकारी व शिक्रापूर, जातेगाव, तळेगाव ढमढेरे, करंदी ग्रामस्थांची पाण्याबाबत आढावा बैठक झाली.
यावेळी चासकमान विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ, शाखा अभियंता महेंद्र गायकवाड, सुनील म्हस्के, शिरुर बाजार समितीचे माजी सभापती अरविंद ढमढेरे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे, अनिल काशीद, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत सदस्य रमेश थोरात, त्रिनयन कळमकर,
प्रकाश वाबळे, सुभाष खैरे, पूजा भुजबळ, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष विजय लोखंडे, भाजपा उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मांढरे, युवा मोर्चाचे रोहित खैरे, राजेंद्र ढमढेरे, शरद उमाप, दीपक भुजबळ, बाळासाहेब वाबळे शिक्रापूर, करंदी, जातेगावसह तळेगाव ढमढेरेचे ग्रामस्थ उपस्थित होते.
आम्हाला पाणी वेळेतच द्या
यावेळी शेतकरी व ग्रामस्थांनी आमच्या जमिनी चासकमान प्रकल्पासाठी गेलेल्या असून आम्हाला वेळेत पाणी मिळालेच पाहिजे, अशी भूमिका मांडली. चासकमान प्रकल्प शिरुर तालुक्यासाठी असल्याने पुढील काही गावातील शेतकऱ्यांना पाणी देणे गरजेचे असल्याने एका गावासाठी पाणी दिल्यानंतर पुढील आवर्तनसाठी ४५ दिवस लागतात. त्यामुळे ग्रामस्थांनी आलेल्या पाण्यासाठी योग्य नियोजन करावे, बंधाऱ्यावरील गळती थांबवावी, पाणीकर भरुन सहकार्य करावे आदी सूचना देखील यावेळी चासकमान विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण गुंजाळ यांनी दिल्या आहे.