दहिवडी – खटाव तालुक्यातील नेर तलावापासून आंधळी धरणात पाणी सोडण्याच्या बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून लवकरच पाणी सोडले जाणार आहे. दुष्काळी भागातील जनतेला मी पाणी आणण्याचे स्वप्न दाखवले होते ती स्वप्नपुर्ती झाली आहे. जिहे –कटापूर योजना पूर्ण होत असताना मला आमदार झालो त्यापेक्षाही मोठा आनंद होत आहे, अशी भावना आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.
माण- खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वरदायिनी असलेल्या जिहे-कटापूर पाणी योजनेच्या नेर तलाव (ता. खटाव) ते आंधळी धरण (ता. माण) या चौदा किलोमीटर अंतर असलेल्या बोगद्याच्या पूर्णत्वास आलेल्या कामाच्या पाहणी दरम्यान पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्य अरुण गोरे, संजय गांधी, युवा नेते सिद्धार्थ गुंडगे आदी समवेत होते. आमदार जयकुमार गोरे पुढे म्हणाले, जिहे- कटापूर पाणी योजना पूर्ण करण्यासाठी झपाटल्यासारखे काम करावे लागले असून यावर चौदा वर्ष प्रयत्न करीत असल्याने नेर तलाव ते आंधळी धरणापर्यंतचा चौदा किलोमीटर लांबीचा बोगदा पूर्ण झाला आहे.
या योजनेला गेल्या बावीस वर्षापासून मान्यता होती. मात्र योजना तशी सातत्याने निधी अभावी रखडली गेली होती. मी ज्यावेळी आमदार झालो, दुष्काळी भागातील जनतेला मी पाणी आणण्याचे स्वप्न दाखवले होते त्या स्वप्न पुर्तीसाठी चौदा वर्षापासून झपाटून काम करीत आहे . प्रचंड इच्छा शक्ती असल्यानंतर व त्याला पाठबळ मिळाल्यानंतर हे शक्य झाले आहे. प्रामाणिकपणे काम करून घेतलेल्या मेहनतीचे हे असलेल फळ म्हणजे हा बोगदा होय. आता माण- खटावचा दुष्काळ निश्चितपणे हाटेल, नेर तलावातून आंधळी धरण, माणगंगा नदीमधून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल. मला हे पूर्ण झालेलं काम पाहून आणि पाणी पोहोचल्या नंतर मोठा आनंद होत असून जेवढा मला आमदार झाल्यानंतर झाला नाही त्यापेक्षाही मोठा आनंद आज होत आहे.
या योजनेला राज्यसरकार निधी देत नाही, मदत करीत नाही, म्हणून त्यांनी “प्रधानमंत्री सिंचन योजने”त जिहे कटापूर योजनेचा समावेश केला. योजनेला गती देण्यासाठी तातडीने अडीचशे कोटी मंजूर करून केंद्र सरकारकडून खाली पाठवले. तसेच आणखी निधी कमी पडल्यास उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले आहे. वाढीव योजनेसाठी पाचशे कोटींची आवश्यकता असून तोही निधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही योजना मार्गी लावण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रचंड मोठ योगदान आहे. या योजनेच्या शुभारंभासाठी पंतप्रधान यावेत, त्यांच्या हस्ते या पाणी पूजन व्हावे, अशीही आमची भावना आहे, पंतप्रधान या भागात आल्यास आणखी निधी मिळून काम मार्गी लागण्यास मदतच होणार असल्याचे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.