पिरंगुट – नांदे (ता. मुळशी) येथील गायरान जागेवर पुणे महानगर पालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, अशी माहिती सरपंच निकिता रानवडे, माजी आदर्श सरपंच प्रशांत रानवडे दिली.
पाषाण-सूस रस्त्यावर पुणे महापालिकेचा कचरा प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रकल्प नांदे येथील गायरान जमिनीवर उभारण्याचा घाट घातला जात आहे. या गायरान क्षेत्राच्या आजूबाजूच्या परिसरात बागायती शेती, तसेच लोकवस्तीही आहे. नजीक नैसर्गिक ओढा असून तो मुळा नदीला मिळतो. नांदे गावाला पिण्याच्या पाण्यासाठीची विहीर याच मुळा नदीच्या काठावर असून त्या ठिकाणी हा ओढा मिळालेला आहे. या प्रकल्पामुळे नदीचे पाणी दूषित होऊन आरोग्याच्या समस्या वाढणार आहेत.
शेतीच्या पिकांना हानी होणार आहे. जनावरे व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण होणार आहे. महानगरपालिकेचा कचरा आमच्या ग्रामीण भागातील नांदे परिसरात आणून लोकांच्या आरोग्याशी शासन खेळणार आहे काय ? हा प्रकल्प शासनाने रद्द करून अन्य ठिकाणी त्याचे नियोजन करावे. अन्यथा ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत, असे सरपंच निकिता रानवडे यांनी सांगितले.
या गायरान जागेमध्ये सध्या मुळशी प्रादेशिक पाणी योजनेसाठीची साठवण टाकी उभारली जात आहे. नांदे गावाला मर्यादित गायरान क्षेत्र असून, भविष्यात या जागेवर गावच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याच्या झाल्यास त्यासाठी स्वतंत्र क्षेत्र उपलब्ध नाही. याच गायरान जागेवर आरोग्यकेंद्र, पिण्याच्या पाण्यासाठी विहीर, शाळा, सार्वजनिक उद्यान, व्यायामशाळा तसेच अन्य उपक्रमांच्या बांधकामांसाठी ग्रामपंचायतीने शासनाकडे दोन वर्षांपूर्वी मागणी केली होती. ती अद्याप पूर्ण केलेली नाही. या गायरान जागेपासूनच काही अंतरावर सिंबायोसिस, आयएसबीएम, ध्रुव आदी शैक्षणिक संस्था, तसेच लुपीन ही औषध निर्माण कंपनी असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील कचरा प्रकल्प नांदे गावाला हलवून आम्हाला कशासाठी त्रास दिला जातोय. जी नव्याने 13 गावे समाविष्ट झाली आहे त्या गावात हा प्रकल्प उभारावा. आमच्या गावामध्ये हा प्रकल्प आणल्यास आमचा त्यास विरोध असून आम्ही जनआंदोलन करू.
-प्रशांत रानवडे, माजी आदर्श सरपंच