पिरंगुट -ग्रामसुरक्षा यंत्रणा ही गावातील प्रत्येक नागरिकाल उपयोगी पडणार आहे. नागरिकांनीही यात सहभागी झाले पाहिजे. परिणामी या यंत्रणेमुळे गावातील व परिसरातील गुन्हेगारीला आळा बसणार आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणा ही गावासाठी वरदान ठरणार आहे, असे प्रतिपादन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक दत्तात्रय गोरडे यांनी केले.
घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथे पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामस्थांना ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले, यावेळी दत्तात्रय गोरडे बोलत होते. यावेळी पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, विविध गावांचे पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य उपस्थित होते.
ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक दत्तात्रय गोरडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे या यंत्रणेची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, ग्रामसुरक्षा यंत्रणा ही प्रत्येकाच्या मोबाइलमधून कार्यान्वित होणार आहे. गावपातळीवर ग्रामपंचायतला केंद्रस्थानी ठेवून ही यंत्रणा राबण्यात येणार आहे. ही यंत्रणा स्वयंचलित असून यामध्ये सहभागी असलेली प्रत्येक व्यक्ती संपूर्ण परिसराला सावध करेल. गावातील नागरिकांना एकाच वेळी संदेश अथवा माहिती देण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी ठरणार आहे.
दरम्यान ही यंत्रणा ग्रामपंचायतीने स्वखर्चाने गावात राबवायची आहे. यास तात्काळ प्रतिसाद देत तालुक्याची औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिरंगुट ग्रामपंचायतीने ही यंत्रणा लगेच गावात राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ग्रामपंचायत मार्फ़त खर्च करणार असल्याचे सरपंच चांगदेव पवळे यांनी यावेळी सांगितले.
मुळशी तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. वारंवार चोऱ्या-दरोडे, अपघात, वाहन चोरी, आग, पाण्यात बुडून मृत्यू होणे आदी घटना घडत असतात. अशा आपत्कालीन परिस्थितीत ही ग्रामसुरक्षा यंत्रणा उपयोगी ठरणार आहे.
अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पौड