सर्वच क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरची खरेदी
मुंबई – गेल्या सहा दिवसांपासून शेअर बाजारात जोरदार विक्री होऊन गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. आता निर्देशांक बरेच खालच्या पातळीवर असल्यामुळे निवडक खरेदी झाल्याने शुक्रवारी शेअर बाजाराचे निर्देशांक सव्वादोन टक्क्यापर्यंत वाढले.
शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 835 अंकांनी म्हणजे 2.28 टक्क्यांनी वाढून 37,388 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 244 अंकांनी वाढून 11,050 अंकांवर बंद झाला.
आज झालेल्या जोरदार खरेदीमुळे सर्वच क्षेत्रांचे निर्देशांक वाढले. बजाज फिन्सर्व्ह, एचसीएल, भारती एअरटेल, इंडसइंड बॅंक, एल अँड टी, टीसीएस, ओएनजीसी, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फायनान्स, स्टेट बॅंकेच्या शेअर मध्ये 6.64 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
दुसऱ्या पॅकेजची चर्चा
अर्थव्यवस्था कमकुवत झाल्यामुळे दुसऱ्या पॅकेजची आवश्यकता अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्यक्त केली होती. त्यानंतर अमेरिकेमध्ये दुसरे पॅकेज जाहीर करण्याबाबत ट्रम्प प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शुक्रवारी जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण होते त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. भारतातही दुसऱ्या पॅकेजची चर्चा चालू आहे.