काढणी होत नसल्याने आवक घटली : मागणी जास्त भावात मात्र वाढ
पुणे – राज्यात पावसाच्या माऱ्याने भाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या भाज्या हलक्या प्रतीच्या आहेत. मात्र, त्या तुलनेत मागणी अधिक असल्याने फळभाज्या आणि पालेभाज्यांचे गड्डीचे भाव वाढल्याची माहिती विक्रेते धनजंय माने यांनी दिली.
मार्केट यार्डातील तरकारी विभागात पुणे जिल्हा, विभागासह परराज्यातून भाज्यांची आवक होते. मात्र, पुणे विभागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे भाज्यांचे नुकसान होत आहे. पाऊस थांबत नसल्याने काढणी होत नाही.
त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमी होत आहे. त्यामुळेच काही फळभाज्यांचे किलोचे भाव 100 ते 150 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर पालेभाज्यांच्या गड्डीचे भावाने 30 ते 40 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
पुणे विभागातूनच बहुतांश भाज्यांची आवक होत असते. मात्र सद्य:स्थितीत पुणे जिल्हा तसेच नगर, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे परराज्यातून काही भाज्यांची बाजारात आवक वाढली आहे.
मात्र, पावसामुळे भाज्यांचा दर्जा खालावला आहे. मात्र, मागणी अधिक असल्याने हलक्या प्रतीच्या मालासाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याचेही व्यापारी आणि विक्रेत्यांनी स्पष्ट केले.
आणखी काही दिवस तुटवडा राहणार
आणखी काही दिवस पाऊस कायम असणार आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांचा तुटवडा कायम असणार आहे. त्यामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव नेहमीपेक्षा अधिक असणार आहेत. मात्र, पाऊस थांबल्यानंतर भाज्यांची आवक वाढेल. त्यावेळी मात्र दरात काही प्रमाणात घट होईल. असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.