वालचंदनगर कंपनीच्या संपावर आमदार भरणेंचे मत
वालचंदनगर – वालचंदनगर उद्योग समूह हा देशासाठी योगदान देणारा आणि कामगारांची हित जोपासणारा म्हणून नावलौकिक असलेला उद्योग समूह आहे.
या उद्योग समूहाला 100 पेक्षा अधिक वर्षांची यशस्वी परंपरा आहे. या वालचंदनगर कंपनीतील कामगारांवर संपाचा मार्ग अवलंबण्याचा प्रसंग यावा ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मात्र प्रामाणिकपणे काम करणार्या कामगारांवर कधीही उपासमारीची वेळ येणार नाही.
कामगारांच्या संपाच्या विषयी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, कामगार मंत्री, वालचंदनगर कंपनीचे पदाधिकारी आणि कामगार समन्वय संघाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन कामगारांना लवकरात लवकर न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी वालचंदनगर येथील संपातील कामगारांनी भरणे यांची भेट घेऊन गेल्या 25 दिवसांपासून असलेल्या संपाच्या झळा त्यातून कामगारांची होत असलेली गळचेपी आणि गंभीर समस्यांविषयी सविस्तरपणे चर्चा केली. वालचंदनगर येथील वालचंदनगर कंपनीतील आयएमडी कामगार समन्वय संघाच्या 630 कामगारांनी 22 नोव्हेंबर पासुन संपाला सुरूवात केली आहे.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी सत्कार टाळला
वालचंदनगर कंपनीतील कामगारांचा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये मांडल्याबद्दल वालचंदनगर कामगार भरणे यांचा सत्कार करणार होते; मात्र भरणे यांनी सत्कारापेक्षा कामगारांचा प्रश्न महत्वाचा असून आदोगर कामगारांचा प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले.