पुणे – बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप होत नाही. त्यामुळे त्यांच्या शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सरकारने करावा, असे राज्यपाल रमेश बैश यांनी काही दिवसांपूर्वी सुचविले होते. त्यावर येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भात अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. राज्यपालांच्या मताशी सरकार सहमत आहे. मात्र, एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सातऐवजी नऊपर्यंत पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, असे त्यांनी सांगितले.
बालवाडी ते दुसरीला आता पूर्व प्राथमिक
बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्यानंतर आता बालवाडी ते दुसरीला ‘पूर्व प्राथमिक विभाग’ संबोधण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.