खासदार सुप्रिया सुळे : भाजपसोबत जाण्याबाबत तोडले मौन
इंदापूर – माझ्या मुलीचा वाढदिवस होता, तो साजरा करता आला नाही. कारण त्या दिवशी मी कोर्टात होते; मात्र माझ्या मुलीचा मला अभिमान वाटतो.तिला वाटले माझे आजोबा (शरद पवार) लढताहेत. त्यामुळे वाढदिवस महत्त्वाचा नाही.आपली लढाई महत्त्वाची आहे. माझ्याकडेदेखील दोन चॉइस होते एक सत्तेचा, दुसरा संघर्षाचा… मी सत्तेचा चॉइस निवडला असता तर, चार लाल दिव्यांच्या गाड्या घेऊन आज सभेला असते. कदाचित आज मी नरसिंहपूरला सुद्धा आले असते; परंतु तो मार्ग मी निवडला नाही, असे बोलत नरसिंहपूरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेल्या नेत्यांचे (आमदार भरणे) खासदार सुप्रिया सुळे यांनी कान टोचले.
इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, सागर मिसाळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या, पहिल्यांदा मी आले तेव्हा खूप कुटुंब मोठे होतं. ज्या ज्या सभा या कार्यालयात झाल्या त्या-त्या वेळेस शरद पवार साहेबांच्या मुलीला मतदान करा, अशी परिस्थिती होती. ज्यावेळेस लोकसभेचे इलेक्शन झाले त्यावेळेस प्रवीण माने लहान होते. तर दशरथ दादा माने हिंदीमध्ये भाषण करायचे. मला वाटायचं इंदापूरमध्ये हिंदीमध्ये भाषण कोण ऐकणार? अख्ख्या बारामती लोकसभा मतदारसंघात हसत खेळत दौरा इंदापूर तालुक्यात होत होता.
आमच्या कुटुंबातील अजितदादा, श्रीनिवास बापू, शर्मिला वहिनी, राजू दादा यांच्या सर्व कुटुंबीयांचे स्नेहसंबंध इंदापूर तालुक्यातील जनतेशी अनेक वर्षापासून जोडलेले आहेत. एवढेच काय; परंतु हर्षवर्धन पाटील भाऊ यांच्या पत्नी बारामतीच्या आहेत. त्यामुळे या सगळ्या नात्यांमध्ये खूप मोठा गोतावळा निर्माण झाला आहे. मी आज ब्रेकिंग न्यूज देणार नाही; मात्र माझी जी लोकसभा
मतदारसंघात व भारतात ओळख आहे, ती फक्त या विश्वासामुळे.
तेव्हा मतभेद होते, मनभेद नाही
2014ला भ्रष्टाचार व महागाई हे दोन विषय लोकांच्या डोळ्यासमोर होते. मी आज भारतीय जनता पार्टीला विचारते भ्रष्टाचार मुक्त भारत “ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असे भाजप म्हणायचा. जेव्हा अटलजी वाजपेयी त्यांचे प्रधानमंत्री होते. जेव्हा सुषमाजी होत्या, अरुणजी होते, तेव्हा खरेच भारतीय जनता पार्टी होती; मात्र आता नाही. त्यावेळेस मतभेद होते; परंतु मनभेद नव्हते. असे म्हणत भारतीय जनता पार्टीवर कडक शब्दांत निशाणा खासदार सुप्रिया सुळे यांनी साधला.